• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षातील पाच उमेदवारांची नावे जाहीर!

ByEditor

Mar 30, 2024

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी शरद पवार गटाने त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार पक्षाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत बारामती, शिरुर, अहमदनगर, वर्धा आणि दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी वाचून दाखवली. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरुरमधून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अहमदनगरमधून नीलेश लंके यांच्या नावाची घोषणा केली . वर्ध्यामधून अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्करराव बगरे यांना संधी देण्यात आली. तर, पक्षाची पुढील यादी आणि उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

“विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्तासमोर रणशिंग फुंकण्यासाठी तुतारी सज्ज आहे”, अशा आशयाचे शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

देशात १९ एप्रिल ते १ जून २०२४ अशा ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. तर, ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे आणि पाचवा आणि शेवटचा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे, अशी महिती निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी दिली.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान

पहिला टप्पा (१९ एप्रिल २०२४): रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.

दुसरा टप्पा (२६ एप्रिल २०२४): बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.

तिसरा टप्पा (७ मे २०२४): रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा (१३ मे २०२४): नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा (२० मे २०२४): धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!