अनंत नारंगीकर
उरण : पनवेल खांदा गावातून आपल्या भाच्याच्या लग्न समारंभातून परतताना मामाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) चिर्ले (अटल सेतू) नजीक पळस्पे-जेएनपीए महामार्गावर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी अपघातस्थळावर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला.

मिळालेल्या माहितीनुसार उरण तालुक्यातील मोठी जुई गावातील माजी उपसरपंच वसंत तुळशीराम भोईर हे शनिवारी (दि. ३०) पनवेल येथील खांदा गावातून आपल्या भाच्याच्या लग्न समारंभातून पळस्पे-जेएनपीए महामार्गावरून आपल्या मोटारसायकलवरून मोठी जुई गावाकडे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास येत होते. वसंत भोईर हे मुंबई शहराकडे जाणाऱ्या अटल सेतू या चिर्ले गावाजवळील उड्डाण पूलाजवळ आले असताना महामार्गावर बेकायदेशीर पार्किंग केलेल्या मालवाहू ट्रेलरला त्यांच्या मोटारसायकने धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात वसंत भोईर हे जागीच मृत्युमुखी पडले. या अपघाताची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला.