नानवली परिसरात बिबट्याचे दर्शन
गणेश प्रभाळे
दिघी : बिबट्याचे नावाने अनेकांचा थरकाप उडतो. श्रीवर्धन तालुक्याचे एक टोक असणारे नानवली गाव येथे गुरुवारी रात्रीच्यावेळी मुख्य रस्त्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेली तीन दिवस सर्वे ते नानवली मार्गावर मुख्य रस्त्याला वावरत असताना हा बिबट्या अचानक येणाऱ्या वाहनांच्या आवाजाने नानवली परिसरातील असलेल्या झाडा झुडपांमध्ये लपून बसतो व पुन्हा रात्री बेरात्री बाहेर येतो. असं गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आता सदर बिबट्याने आपला मोर्चा रहिवासी परिसरात वळविल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील नानवली परिसर म्हणजे जंगल क्षेत्राला जोडून असणारे गाव, तसेच दिघी खाडीला लागून असल्याने हा दुर्गम आणि शांत परिसर म्हणून ओळखला जात आहे. विशेष म्हणजे सदर बिबट्या दिसल्यापासून सर्वांना खबर लागल्याने परिसरात आणखीच दहशत निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे.
खाडी लगत असणाऱ्या दिघी, नानवली, सर्वे या भागात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. विशेषता नानवली – सर्वे हा आड मार्ग असल्याने वाहनांची ये – जा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्यासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे समजते आहे.
सद्या वाघ जंगल सोडून मानववस्तीत आल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे जंगल परिसरातील लोकांचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे, शेतीची हंगामी कामे करणे, किंवा मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालविणे, ही या लोकांची कामे आता बिबट्याच्या भीतीमुळे खोळंबली जाणार आहेत. त्यामुळे वनविभागाकडून जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त लावला जात नाही, तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर होणार नाही, हेही तितखेच खरे आहे.
गुरुवारी रात्रीच्या वेळी नानवली ते सर्वे रस्त्याने बाइकने जात असताना बिबट्या दिसला. आम्ही मागच होतो. गाडीच्या आवाजाने तो पळून गेल्याचे निदर्शनास आले.
-पंकज हांडे,
ग्रामस्थ, नानवली.