सलीम शेख
माणगाव : मुंबई गोवा महामार्गावर माणगांवपासून ३ किमी अंतरावर असणाऱ्या तिलोरे गावच्या हद्दीत मानस हॉटेल समोर शिवशाही बस व रिक्षामध्ये भीषण अपघात होऊन रिक्षामधील ३ जण ठार झाल्याची घटना घडली.
माणगाव पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास मानस हॉटेलजवळ शिवशाही बस क्र. एमएच ०९ एफएल ०२४६ ही ठाणेवरून दापोलीकडे जात असताना रिक्षा क्र. एमएच ०४ एफसी ६२८२ या रिक्षावरील चालकाने लेनवरून अचानक वळण घेतल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील प्रवीण अनंत मालुसरे, दत्तात्रय नारायण वरंदेकर, गणेश बाबू जाधव (सर्व राहणार ठाणे) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस स्टेशनचे पो. ह. गणेश समेळ, सानप घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मयत यांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणण्यात आले. यावेळी सुरक्षारक्षक विवेक नितनवरे, नागेश दिपके यांनी सहकार्य केले. या घटनेचा पुढील तपास माणगांव पोलीस करीत आहेत.