अनंत नारंगीकर
उरण : कोरोनाच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सने नेत्यांशी, जनतेशी संवाद साधणाऱ्या उध्दव ठाकरेंचा सुपडा साफ आम्ही केला आहे. त्यामुळे त्यांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी होऊ घातलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पुन्हा एकदा मावळचा गड आम्हीच राखणार आहोत असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ जेएनपीए बंदर वसाहतीमधील मल्टीपर्पज हॉल येथे रविवारी (दि. ७) महायुतीचे पदाधिकारी यांच्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित पदाधिकारी यांना संबोधित करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) गटाचे नेते उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

श्रीरंग आप्पा बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचा आदर्शवत खासदार म्हणून दोन वेळा नेतृत्व केले. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कोणत्या प्रकारचे जातीपातीचे राजकारण न करता जनहिताची अनेक कामे सरकारच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्यांना सात वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. आज तेच मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा महायुतीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांचा विजय हा निश्चितच आहे. त्यासाठी नावा रुपाला नसणाऱ्या महाआघाडीच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागणे गरजेचे आहे असे आवाहन उपस्थितांना राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थितांना केले.
मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप महायुती एक जीव झाली आहे. त्यामुळे मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे या मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयाची पताका फडकवतील असा विश्वास लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. तसेच श्रीरंग बारणे यांची धनुष्यबाण ही निशाणी घराघरात पोहोचविण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय व्हावे असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांना केले.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उरण, मावळ लोकसभा मतदारसंघात विविध प्रकारची विकास कामे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावली आहेत. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे. मी केव्हाच नावासाठी काम केले नाही. जनतेच्या हितासाठी काम करत आहे आणि यापुढेही करणार आहे. त्यामुळे मावळची जनता मला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मताधिक्याने निवडून देणार असल्याचा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी व्यक्त केला.
यावेळी उरणचे आमदार महेश बालदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा उमाताई शिंदे, अतुल पाटील यांनी आपले विचार व्यक्त करुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदावर कार्यरत करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय व्हावे असे आवाहन केले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे राज्य प्रदेश सदस्य रुपेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, भाजपचे तालुकाध्यक्ष रवि भोईर, महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष परिश्चित ठाकूर, वैजनाथ ठाकूर, संतोष विचारे यांसह महायुतीचे आजी माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.