अमुलकुमार जैन
अलिबाग : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. यासाठीच निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी लोकसभेच्या एका मतदार संघासाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये होती. ती आता वाढवून ९५ लाख रुपये करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील प्रत्येक लोकसभा मतदार संघातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच महागाईतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही खर्च मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला.
नियमांचे पालन करत निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यादृष्टीने निवडणूक आयोग अत्यंत बारकाईने सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. विविध पक्षांकडून आता उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यानंतर उमेदवारांचा प्रचार सुरू होईल. यासाठी रॅली, सभामंडप, लाऊडस्पीकर यासह ढोल-ताशांचा वापर केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रत्येक वस्तूची किंमत निश्चित केली आहे. उमेदवाराने आपल्या कार्यकर्त्यांना चहा दिल्यास प्रति चहा दहा रुपये आणि कॉफीसाठी बारा तर बिस्कीट पुड्यासाठी दहा रुपये निवडणूक खर्चात जोडले जातील. नाश्त्यासाठी पोहे किंवा उपमा घेतला तर वीस रुपये आणि वडापावसाठी दहा रुपये, समोसे किंवा कचोरीसाठी बारा रुपये तर इडली चटणीसाठी पंधरा रुपये खर्च करू शकतात. लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रचाररथांचा वापर करतात. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने टॅक्सी किंवा कार प्रत्येकी बारा तासांसाठी ३९९० रुपये, प्रवासी बस दोनशे किलोमीटरसाठी १४ हजार ११५, तर जेसीबी प्रती तास इंधनासह एका हजार रुपये असे दर निश्चित केले आहे.
प्रचारासाठी शहर भागात मंगल कार्यालय घेतल्यास वीस हजार रुपये, ग्रामीण भागात घेतल्यास पंधरा हजार रुपये, मैदान भाड्याने घेतल्यास पाच ते पन्नास हजार रुपये, हार छोटे घेतले तर पन्नास ते शंभर आणि मोठे हार घेतले तर दीडशे ते दोनशे रुपये असा दर निश्चित करण्यात आले आहे. उमेदवाराने ढोल-ताशे वापरल्यास निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसार तो खर्च ग्राह्य धरला जाईल. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या किमतीनुसार आपला खर्च डायरीत लिहावा लागेल. यावेळी निवडणूक प्रचार आणि रॅलींमध्ये वापरल्या जाणाऱ्या झेंड्याची किंमत आकाराच्या आधारे ठरवण्यात आली आहे.
निवडणुकीत उमेदवाराने प्रचारावर किती खर्च करायला हवा, याची मर्यादा निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात येते. या मर्यादेपेक्षा अधिक खर्च करणे म्हणजे निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन समजले जाऊन उमेदवारांना नोटीस पाठविली जाते. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा काम करत असते. जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीत उमेदवारांकडून करण्यात येणारा खर्च तपासण्यासाठी जिल्हा दरसूची तयार केली आहे. ही दरसूची गुरुवारी जाहीर केली जाणार आहे. दरसूचीनुसारच ९५ लाखांच्या मर्यादेत उमेदवारांना निवडणूक खर्च करता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
निवडणुक आयोगाने दिलेले दर
व्हेज बिर्याणी-रायता / व्हेज पुलाव-रायता – ५०
भोजन प्लेट – ९०
चिकन थाळी – २३०
मटण थाळी – ३३०
अंडा थाळी – २००
२५० ml पाणी बाटली बॉक्स – ६०
हेलिपॅड – १००००
मुखवटे – २५
नारळ – २०
शाल – ५० ते १५०
फेटा – १००/२००
शाल – ५०ते १५०