• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता काम करणार; महेंद्र घरत यांचे पत्रकार परिषदेत आश्वासन

ByEditor

Apr 16, 2024

विविध अफवा, अपप्रचार दूर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन

विठ्ठल ममताबादे
उरण :
देशात व महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची खूप मोठी ताकद आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सहभागी असून महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारासाठी काँग्रेस प्रत्यक्ष प्रचारात उतरला आहे. महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निवडून येण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले असून मावळ लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) व समविचारी मित्र पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारात काँग्रेस पक्ष प्रत्यक्ष सहभागी असून संजोग वाघेरे यांना काँग्रेसतर्फे जाहीर पाठींबा आहे. संजोग वाघेरे यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता कामाला लागला असून संजोग वाघेरे यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कामाला लागा. संजोग वाघेरे लोकसभेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून येतील असे प्रतिपादन महेंद्र घरत यांनी शेलघर येथे केले.

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र जोरात वाहत आहेत. उन्हाळा असल्यामुळे वातावरण तापत चालले आहे. आता निवडणूक असल्यामुळे राजकीय वातावरणही दिवसेंदिवस तापत चालले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक खोट्या बातम्या, अफवा, खोटा अपप्रचार अनेक ठिकाणी पसरविले जात आहेत. त्यामुळे या अफवा दूर करण्यासाठी व भविष्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडणुकीत कोणत्याही प्रकारे फटका बसू नये, लोकसभा उमेदवाराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये या अनुषंगाने रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मंगळवार, दि. १६ एप्रिल २०२४ रोजी समाज मंदिर हॉल, शेलघर, तालुका उरण येथे सकाळी ११ वाजता बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगार नेते, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे अखलाक शिलोत्री, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील, जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखिल ढवळे, रायगड जिल्हा पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष ॲड. श्रद्धा ठाकूर, महिला तालुका अध्यक्ष रेखा घरत, उपाध्यक्ष निर्मला पाटील, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, खालापूर तालुका अध्यक्ष कृष्णा पारांगे, खोपोली शहराध्यक्ष रिचर्ड जॉन, कर्जत तालुकाध्यक्ष संजय गवळी, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल, रोहा तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, महाड तालुका अध्यक्ष अफजल चांदले, नागोठणे शहराध्यक्ष अशपाक पानसरे, सुधागड पाली तालुका अध्यक्ष बाबा कुलकर्णी आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना महेंद्र घरत म्हणाले की, भिवंडी लोकसभा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी यासाठी मी तसेच काँग्रेस पक्ष आग्रही होतो. मात्र ती जागा दुसऱ्याला गेली. लोकसभेला मावळ मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. काँग्रेसला आशा होती की कोकणात लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळेल पण तसे झाले नाही. तरी विधानसभेला आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील अशी अपेक्षा करतो. मशाल आणि तुतारी हे नवीन चिन्ह आहेत. मात्र, काँग्रेसचे चिन्ह हात हे सर्वांत जुने चिन्ह आहे. त्यामुळे ते लोकांच्या कायमचे लक्षात आहे. असे असले तरी युवा नेते राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. इंडिया आघाडी जिंकायला पाहिजे असे महाविकास आघाडीचे तसेच सर्वसामान्य जनतेचे मत आहे. आज मोदी विरोधात प्रचंड संताप आहे. या मोदी विरोधी लाटेचा फायदा महाविकास आघाडीच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. माजी खासदार तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघात कोणतेही कामे केली नाहीत. जनतेशी संपर्क ठेवला नाही. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. मोदी विरोधी लाट असल्यामुळे संजोग वाघेरे निवडून येतील. देश वाचला पाहिजे, संविधान टिकले पाहिजे अशी नेते राहुल गांधी यांची इच्छा आहे, त्यामुळे संजोग पाटील यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा असे आवाहन महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषदेमुळे जनतेच्या मनातील संभ्रम दूर झाला असून काँग्रेस सारख्या महाबलाढ्य पक्षाचा संजोग वाघेरे यांना पाठिंबा मिळाल्याने संजोग वाघेरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!