विठ्ठल ममताबादे
उरण : न्यायालयात एका वारस दाखल्यांचे काम प्रलंबित असताना मयत मुलीच्या वारसांना डावलून न्यायालयातुन त्याच वारसांनी नवीन दाखला तयार करून घेतला आहे. न्यायालयाची दिशाभूल करुन नवीन वारस दाखल्याच्या आधारावर बिल्डरबरोबर साडेबारा टक्के भूखंड विक्रीचा प्रयत्न चालविल्याची तक्रार करण्यात आली आहे. मात्र, सिडकोचेच काही भ्रष्ट अधिकारी या तक्रारीकडे दुर्लक्ष करून संगनमताने बिल्डरांच्या फायद्यासाठी भुखंड विक्रीस हातभार लावीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाची दिशाभूल करुन मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न करण्याच्या या प्रकाराची मात्र परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
धुतुम ग्रामपंचायत हद्दीत राहाणारे रामा लहू ठाकूर हे गृहस्थ २०१६ मध्ये मयत झाले आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि चार मुली असे वारस आहेत. दरम्यान, त्यांची मुलगी कुंदा ठाकूर यांचेही २०१७ साली निधन झाले आहे. जमिन संपादनाच्या मोबदल्यात सिडकोकडून साडेबारा टक्के विकसित भुखंड मिळणार आहेत. त्यासाठी वडील आणि बहिणीच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस असलेल्या अंकुश ठाकूर, अशोक ठाकूर, नंदा ठाकूर, सुरेखा ठाकूर, अंजली ठाकूर व मयत कुंदा ठाकूर यांचे वारस पुजा घरत, सन्नी ठाकूर, प्रितम ठाकूर, अश्विनी ठाकूर आदी वारसांनी वारस दाखला मिळण्यासाठी उरणच्या दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. २०१९ साली वारसा दाखल्यांसाठी केलेला अर्ज न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहे. मात्र, वारस दाखला प्रलंबित असतानाही अंकुश ठाकूर, अशोक ठाकूर, नंदा ठाकूर, सुरेखा ठाकूर, अंजली ठाकूर आदी वारसांनी मयत कुंदा ठाकूर यांचे वारस पुजा घरत, सन्नी ठाकूर, प्रितम ठाकूर, अश्विनी ठाकूर आदी वारसांना डावलून २०२०मध्ये उरण न्यायालयात वारस दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयानेही वारस दाखला कुंदा ठाकूर यांचे वारस पुजा घरत, सन्नी ठाकूर, प्रितम ठाकूर, अश्विनी ठाकूर आदी वारसांना डावलून वारस दाखला दिला आहे. न्यायालयाची दिशाभूल करुन मिळालेल्या वारस दाखल्याच्या आधारावर त्यांनी सिडकोकडे साडेबारा टक्के विकसित भुखंड मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
याची माहिती मिळताच मयत कुंदा ठाकूर यांच्या वारसांनी सिडकोकडे तक्रार करून साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप करु नये अशी विनंती केली आहे. मात्र, सिडकोचेच काही भ्रष्ट अधिकाऱी या तक्रारीकडे दुर्लक्ष करून संगनमताने बिल्डरांच्या फायद्यासाठी भुखंड विक्रीस हातभार लावीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाची दिशाभूल करुन मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी अन्याय झालेल्या वारसांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
