• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आजची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता -अनंत गीते

ByEditor

Apr 28, 2024

देश ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही तर श्रीवर्धन ही देखील कोणाची खाजगी मालमत्ता नाही
दोन्ही सातबारे ह्यावेळी जनता कोरे करणार; अनंत गीते यांचे टीकास्त्र
इंडिया आघाडीची बोर्ली पंचतन येथे प्रचार सभा

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
सतरा घरे बदलणारे आता ज्या घरात आहेत त्या अजित पवारांना वाईट दिवस आले तर ते भाजप मध्ये कधी उडी मारतील हे सांगू शकत नाहीत, त्यानंतर पुन्हा भाजप ला वाईट दिवस आले तर हे पुन्हा काँग्रेस मध्ये जातील तेव्हा यांची एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होईल आणि त्यावेळी आपण यांचा सत्कार करू असा खोचक टोला इंडिया आघाडीच्या शिवसेना पक्षाच्या उबाठा गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांना लगावला. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील प्रचार सभेमध्ये अनंत गीते बोलत होते.

जशी 7 मे तारीख जवळ येत आहे तसा प्रचाराचा देखील जोर वाढत आहे आणि आपल्या परस्पर विरोधी असणाऱ्या उमेदवारावर टीकाटिप्पणीला देखील प्रचंड जोर येताना दिसत आहे. 32 रायगड लोकसभा मतदार संघामध्ये खरी लढत अनंत गीते व सुनील तटकरे या दोन उमेदवारांमध्ये पहावयास मिळणार आहे. आपल्या प्रमुख विरोधी उमेदवारांवर टीका करण्याची संधी मात्र दोघेही सोडत नाहीत असे सध्या चित्र आहे. यातच इंडिया आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचार सभा बोर्ली पंचतन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, आंदोलनकर्त्या उल्का महाजन, सुजित तांदळेकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विजय तोडणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस वसंत यादव, शब्बीर फकीर तसेच इतर बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आपल्या धडाकेबाज मनोगतामध्ये अनंत गीते यांनी विरोधी उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, काहींना श्रीवर्धन म्हणजे आपली खाजगी मालमत्ता असल्याचं वाटू लागले आहे. त्यांचा श्रीवर्धनचा सातबारा 7 मेला कोरा करायचा आहे. इंडिया आघाडीमध्ये आम्ही पक्ष एकत्र आलोय कारण देश संकटात आहे. देशाची लोकशाही व संविधान संकटात आहे. हे सर्व जुलूमांच्या हातून वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याची टीका गिते यांनी केली. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या कालावधीत प्रजेचे राज्य राहिलेले नाही. फक्त दोन नेते देश चालवीत आहेत, भाजप नाही. जे दोघे हे देश चालवीत आहेत त्यांनी भाजपला व संघाला देखील संपविले असल्याची टीका नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे नाव न घेता गीते यांनी केली.

भारत सरकारचे मोदी सरकार झाले ही काही यांची खाजगी मालमत्ता आहे का? असा खोचक सवाल गीते यांनी केला. त्यामुळे देशाच्या सातबारावरील नाव देखील यावेळी कोरा करायचा आहे असे आव्हान गीते यांनी उपस्थितांना केले. सध्या भारताच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे. त्यांनाच सुरुंग लावून त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. ज्यांना बॅ. अंतुले यांनी राजकीय जन्म दिला, काँग्रेसने आधार दिला त्यांना विसरले. आता राष्ट्रवादी काँग्रेसला विसरले, उद्या अजित पवारांचे दिवस वाईट आले की हे भाजपमध्ये जातील, तिथे भाजपचेही दिवस वाईट आले की काँग्रेसमध्ये जातील, मग यांची एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होईल. त्यावेळी यांचा नागरी सत्कार करू अशी खोचक टीका सुनील तटकरे यांचेवर गीते यांनी केली. मागच्या निवडणुकीमध्ये केलेली चूक यावेळी सुधारा असे आवाहन अनंत गीते यांनी उपस्थित जनसमुदायास केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!