• भाजीच्या टोपल्या रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी
• पालिका आणि पोलीस प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध
मिलिंद माने
महाड : महाड बाजारपेठ ही जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ असली तरी महाड नगरपालिका व वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनाअभावी बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण झाले आहेत. शहरात असलेले दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आपला माल समोरील नाल्यावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होवून पादचाऱ्यांना देखील त्रास होताना दिसत आहे. याबाबत कायम तक्रारी होवून देखील महाड नगरपालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासन थातूरमातूर कारवाई करून सोडून देत आहेत. महाड शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानदार आणि कर्मचाऱ्यांमधील आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई होत नाही अशी चर्चा गावात सुरु आहे.

महाड शहराला सर्वात मोठी बाजारपेठ लाभली आहे. यामुळे तालुक्यासह शेजारील पोलादपूर, माणगाव, मंडणगड, म्हसळा आणि गोरेगाव येथून नागरिक खरेदीसाठी येत असतात. शिवाय महाड हे ऐतिहासिक शहर असल्याने याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक, शिवप्रेमी, भीमसैनिक दाखल होत असतात. गेली अनेक वर्षात शहराचा विस्तार देखील वाढू लागल्याने लोकसंख्येत देखील वाढ झाली आहे. लोकसंख्या आणि बाजारपेठेतील गर्दी पाहता मुख्य बाजारपेठ रुंदीकरण झालेले नाही. यामुळे मुख्य बाजारपेठेत अवजड वाहन शिरताच अन्य वाहनांना रस्त्यावरील भाजी विक्रेते व दुकानदारांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडी होत आहे.

मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण नगर रचना आणि विकास यामधील नियमात बसवला गेलेला नाही. यामुळे बाजारपेठ अरुंदच राहिली आहे. त्यातच अनेक दुकानदार आपला माल आणि विक्रीला आलेले सामान रस्त्यावर किंवा गटारावरच लावून ठेवत असल्याने पादचाऱ्यांना देखील त्रासदायक ठरत आहे. महाड शहरात ही अवस्था छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानदास बेकरी मार्ग, पिंपळपार ते थेट जुना पोस्ट, सुकट गल्ली या ठिकाणी शहरातील अंतर्गत रस्ते या रस्त्यांवर कायम वाहतूक कोंडी दिसून येत आहे. मुख्य बाजारपेठ आणि अन्य जोड मार्गांवर रत्यालगत बसलेल्या शेतकरी, छोटे भाजी विक्रेते यांच्याकडून दुकानदार पायरीवर बसण्याचे पैसे मोजतात असे सांगण्यात येते. त्यामुळे पालिका देखील ठराविक रकमेची पावती बनवून पैसे वसुल करण्याचे काम करते.

शहरात विविध ठिकाणी जोड मार्गांवर भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान मांडले आहे. त्यातच हातगाड्यांचा मोठा वावर आहे. रस्त्यांचे कोपरे फळ विक्रेत्यांनी पकडले आहेत. तर गाळे भाड्याने घेवून देखील गाळे रिकामे ठेवून दिवसभर काही भाजी विक्रेते स्पर्धा लावून रस्त्यांवर बसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भाजी विक्रेत्यांनी तर आमच्या बापाचा रस्ता अशा तोऱ्यात रस्ता अडवला आहे. यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी कोणतीही कारवाई करू शकत नाहीत असे संबंधित भाजी व्यापारी लोकांना सांगत आहेत. यामुळे मुख्याधिकाऱ्यांचे हात बरबटलेले तर नाहीत ना? अशी शंका सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते जोरजोरात ओरडून ग्राहक आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा दिवसभर सुरु असते. मात्र, यामध्ये सर्वसामान्य माणसाचे हाल होताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानदास बेकरी यादरम्यान असलेल्या भाजी विक्रेत्यांनी तर बिनदिक्कत रस्त्यावर ठाण मांडले आहे. सध्या या मार्गावरून दापोली, मंडणगड, खेडकडे जाणाऱ्या आणि त्याठिकणाहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. यामध्ये बसेसचा देखील समावेश आहे. या वाहनचालकांना देखील याचा त्रास होताना दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजमाता जिजाऊ गार्डनपर्यंत देखील पदपथ शिल्लक ठेवलेला नाही. स्थानिक विक्रेत्यांनी या पदपथावर विक्री सुरु केल्याने याठिकाणी लागणाऱ्या रिक्षा देखील अनेक वेळा या विक्रेत्यांच्या पुढे रस्त्यावर उभ्या करतात.

छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी पोलीस वाहतूक शाखेचे केंद्र तर महाड नगरपालिकेचे प्रशासकीय भवन आहे. मात्र, रस्त्यातील भाजीवाल्यांचे अडथळे, दुकानांचा माल याकडे पालिका आणि पोलीस कर्मचारी डोळेझाक करत असल्याने या विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. वाहतूक आणि शहर विकासाचे नियोजन नसल्याने ही अवस्था दिसून येत आहे. एकीकडे मतदार जपण्याचे काम पुढारी करत असल्याने नकळत रत्यावर बेकायदेशीर विक्री करणाऱ्या लोकांना सरंक्षण मिळत आहे. तात्पुरती कारवाई केल्यानंतर अवघ्या कांही मिनिटातच पुन्हा निर्ढावलेले दुकानदार आपला माल रस्त्यावर लावत आहेत. आमचे कोणीच वाकडे करू शकत नाही अशा अविर्भावात ते वावरत आहेत. स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे देखील या दुकानदारांना पाठबळ आहे.

कारवाई करताना काही टपऱ्या का सुटतात ?
ज्या ज्या वेळेस कारवाई झाली त्या त्या वेळेस शहरातील काही रस्त्यावर असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली जात नाही. या टपऱ्या शहरातील काही पुढाऱ्यांनी उभ्या करून भाडे तत्वावर दिल्या आहेत. यामुळे साहजिकच यावर कारवाई होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काही अनधिकृत गाळे देखील विनापरवाना उभे आहेत. याच ठिकाणी रस्त्यावर भाजीचे दुकान रस्त्यावर आणून शेजारीच गाळा रिकामा ठेवून उसाचा सरबत विकणाऱ्या विक्रेत्यावर देखील कारवाई करण्यास पालिका प्रशासनाचे हात धजावत नाहीत. तक्रारी झाल्यानंतर स्थानिक सर्वसामान्य विक्रेत्यांवर थातुरमातुर कारवाई केली जाते. मात्र, अन्य काही लोकांना अभय दिले जात आहे.
स्वतंत्र पथकाची गरज
सद्यस्थितीत शहरात वाहतूक नियोजनासाठी एकच पोलीस कर्मचारी आहे. हा पोलीस कर्मचारी देखील फक्त छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातच घिरट्या घालत पावत्या फाडण्याचे काम करत आहे. तर पालिका प्रशासनाचे कर्मचारी हे दुकानदारांच्या अगदी जवळचे असल्याने कारवाई होण्यापूर्वी या दुकानदारांना सावध करण्याचे काम करतात. यामुळे महाड शहरात स्वतंत्र पथकाची गरज निर्माण झाली आहे. पे अँड पार्क सुविधा देखील सुरु करण्यात आली होती मात्र हि योजना देखील बारगळली आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जुन्या भाजी मार्केटची जागा पडीक आहे. याठिकाणी पे अँड पार्क सुविधा निर्माण केली पाहिजे.