विनायक पाटील
पेण : महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी वढाव, ता. पेण येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील, डी बी पाटील,दयानंद भगत, प्रभाकर म्हात्रे, मिलिंद पाटील, विकास म्हात्रे, श्रीकांत पाटील, संजय म्हात्रे, तुषार मानकवळे, चैत्राली पाटील, अशोक पाटील, वढाव सरपंच पूजा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सुनील तटकरे म्हणाले कि, कोणताच विषय नसल्यामुळे विरोधक ही आवई उठवत आहेत परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही आरक्षण बदलणार नसल्याची ग्वाही दिली आहे. कोरोना काळात प्रगत देशामध्ये लाखो लोक मृत्यूमुखी पडले मात्र, भारतात मृत्यूचे प्रमाण कमी राहिले. १३० कोटी जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय मोदींनी घेतला. मोदींच्या नेतृत्वाखाली देश वेगळ्या उंचीवर गेला आहे असे तटकरे म्हणाले. रायगडवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही फिरत होतो. गीते त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न तटकरे यांनी उपस्थित केला. सहा वेळा खासदार व त्यामध्ये दोन वेळा केंद्रात मंत्री पदाची सत्ता मिळाली असताना देखील एकही रोजगाराची संधी गीते यांना उपलब्ध करता आली नसल्याची टीका सुनील तटकरे यांनी यावेळी केली. ज्याला स्वतः चा खासदार निधी संपवता येत नाही त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही.अनंत गीते यांचे या मतदार संघात नाव नाही मागील आठ ही निवडणुकीत त्यांनी मतदान न करता एक विक्रमच केला आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वा खाली देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे आमदार रविंद्र पाटील यांनी यावेळी म्हटले. पेण वाशी खारेपाट विभागाचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुटला असल्याचे त्यांनी म्हटले.
वाशी,वडखळ विभागातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे काम करणार असल्याचे रायगड जिल्हा भाजपा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.