• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अजून किती वर्षे टँकरच्या मागे धावायचं?

ByEditor

Apr 30, 2024

श्रीवर्धनला यावर्षी 64 लाखांचा पाणीटंचाई आराखडा

मागणीनुसार पाणीटंचाई आराखडा मात्र, प्रत्यक्षात अनेक गावे तहानलेलीच

जलजीवन योजना पूर्ण असूनही ‘हर घर जल’ आलेच नाही

गणेश प्रभाळे
दिघी :
उन्हाळ्याच्या काळात श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील काही गावात निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता पंचायत समितीकडून 64 लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत पाणी टंचाई निवारणार्थ टँकर ने पाणीपुरवठा व विंधन विहीर बांधण्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी पाणी योजना राबवल्या, तरीदेखील पाणी टंचाई दूर झालीच नाही.

श्रीवर्धन तालुक्यात पावसाळ्यात सर्वत्र चांगले पर्जन्यमान राहिले तरी अनेक गावांमधून उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. काही गावांमधून निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता प्रशासनाने 64 लाख रुपयांचा कृती आराखडा प्रस्तावित करुन मंजूर केला आहे. यामध्ये विंधन विहिरी घेणे व गावांमधून टँकरने पाणीपुरवठा करणे या उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तालुक्यात सध्या पंचवीस गावे आणि एकतीस वाड्या पाणीटंचाई सदृश असल्याने प्रस्तावित उपाययोजना केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीयोजने तुन तालुका टँकरमुक्त होणे अपेक्षित होते मात्र ते स्वप्न अद्यापही अपूर्णच राहिले आहे.

टँकरने पाणीपुरवठ्यासाठी –
पंचायत समितीकडून मंजूर पाणीटंचाई आराखड्यात त्रेचाळीस लाख रुपये हे सहा टँकर द्वारे पाणी पुरवठा साठी मंजूर केले आहेत. दरवर्षी हे टँकर चे नियोजन असते त्यामुळे श्रीवर्धन टँकर मुक्त कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय.

विंधन विहिरींसाठी –
30 जून पर्यंत प्रस्तावित एकवीस विहिरींसाठी एकवीस लाखांची तरतूद केली आहे. खारगाव, कारिवणे कोंड, भारडखोल, कुडकी, खुजारे, भोस्ते, कुंभारआळी, कुडगाव मोहल्ला, बोर्ला , साक्षीभैरी रानवली, सर्वे, दिघी, वडवली, शिस्ते व बोर्लीपंचतन या भागात विहीर बांधण्याचे प्रस्तावित आहे.

येथे असते नेमिची पाणीटंचाई
गेल्यावर्षी शेखाडी गावातील समर्थवाडी, मोहल्ला आणि मुळगाव, सायगाव केळीची वाडी, टेपरी मारळ, कोलमांडला, नागलोली अंतर्गत धनगरमलई, नवीवाडी, मधलीवाडी व वावे आदिवासीवाडी इत्यादी 11 भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. यावर्षी देखील मागणीनुसार येथे पाणी टँकरने देण्याचे प्रस्तावित केले आहे.

‘हर घर जल’ची प्रतिक्षाच
ग्रामीण भागात शासनाकडून पाणी टंचाई दूर करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी योजना पूर्ण होऊन पाणी पोहोचल्याचा दावा केला जातो. मात्र, या मिशन द्वारे पूर्ण झालेल्या योजनेचे घराघरात पाणी मिळत नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. हर घर जल असे घोषवाक्य असलेल्या या योजनेचे मूळ उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे दिसते.

नागलोली अंतर्गत सात वाड्यांसाठी जवळपास दोन कोटी रुपयांची जलाजीवन योजना राबविण्यात आली. मात्र, निकृष्ट कामामुळे योजनेचा लाभ आम्हाला मिळालाच नाही.

-जयेश जाधव, रहिवासी नागलोली.
-सचिन विचारे, रहिवासी नागलोली.

कार्ले आदिवासी वाडीवर पिण्यासाठी पाणी नाही. या समस्येमुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. गेली कित्येक वर्ष पाणी मिळण्यासाठी मागणी होतंय. मात्र, अद्याप लक्ष दिलेच नाही.

-शशी पवार,
रहिवासी आदिवासीवाडी कार्ले.

पाणी टंचाई अराखड्या नुसार शेखाडी, मारळ याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

-गजानन लेंडी,
गटविकास अधिकारी, श्रीवर्धन.
श्रीवर्धन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अखत्यारीत तालुक्यात जलजीवन मिशन योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे पाणीटंचाई संदर्भात अधिक माहिती विचारण्याकरिता संबंधित विभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, संपर्क झाला नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!