• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तापमानाचा पारा वाढला पण मतदानाची टक्केवारी घडली!

ByEditor

May 2, 2024

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढणार का?

मिलिंद माने
महाड :
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत असून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा पारा 43 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत पोहोचला आहे. त्यातच पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घटली असताना तिसऱ्या टप्प्यात तापमानाबरोबर मतदानाचा पारा (टक्केवारी) वाढवून मतदान करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना आपापल्या पक्षाचे मतदान काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सन 2019 मधील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अंदाजे २९७ दशलक्ष पात्र मतदारांनी मतदान केले नाही. यावरून मतदान न करणाऱ्या समस्येचे गांभीर्य अधोरेखित होते. यामध्ये मतदान झालेल्या ११ राज्यांमधील ४९ ग्रामीण लोकसभा मतदारसंघांपैकी ४० लोकसभा मतदारसंघ हे उत्तरप्रदेश (२२ पीसी) आणि बिहार (१८ पीसी) मधील आहेत. उत्तरप्रदेशात ५१ फुलपूर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४८.६०% मतदान झाले तर बिहारमध्ये २९ नालंदा लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४८.७९ टक्के मतदान झाले.

दुसऱ्या टप्प्यात झालेल्या देशातील १३ राज्यातील मतदानाची आकडेवारी पाहिल्यास आसाम ६०.३% , बिहार ४४.२% , छत्तीसगड ६३.९% , जम्मू आणि काश्मीर ५७.७ टक्के, कर्नाटक ५०.९%, केरळा ५१.६४%, मध्यप्रदेश ४६.६%, महाराष्ट्र ४३.१%, मणिपूर ६८.४८% , राजस्थान ५०.२७%, त्रिपुरा ६८.९२%, उत्तर प्रदेश ४४.१३%, व पश्चिम बंगाल ६०.६% झालेल्या मतदानाची टक्केवारीमध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान म्हणजे ४३.१ % झाले आहे.

सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यात ३२ रायगड, ३५ बारामती, ४० उस्मानाबाद, ४१ लातूर, ४२ सोलापूर, ४३ माढा, ४४ सांगली, ४५ सातारा, ४६ रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ४७ कोल्हापूर, ४८ हातकणंगले या ११ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक ७ मे रोजी होत आहे. राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होत असताना या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वाढत्या तापमानाने आधीच हाहाकार माजविला आहे. त्यातच पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने मतदार वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईमुळे बेजार झाला आहे. राज्यात उष्णतेचा पारा ४३ ते ४५ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणावर सर्वत्र जाणवत आहे. त्यामुळे सकाळी नऊच्या आधीच सर्वसामान्य नागरिक आपली कामे उरकून घरातच बसतात. त्यातच सात मे रोजी मतदान असल्याने व एप्रिल महिन्यापेक्षा मे महिना हा उष्णतेची तीव्रता अधिक असणारा महिना असल्याने या काळात उष्णतेची तीव्रता किती जाणवते यावर मतदानाची टक्केवारी अवलंबून आहे.

32 रायगड लोकसभा मतदारसंघात १६७७ साली ६१.६८%, तर १९८० साली ६३.५%, तर १९८४ साली ६४.४३%, १९८९ साली ६६.२% , १९९१ साली ५१.९३%, १९९६ साली ५७.६८%, १९९८ साली ५७.७९%., २००४ साली ६१.३२%, २००९ साली ५६.२७%, २०१४ साली ६४.४७%, तर २०१९च्या निवडणुकीत ६१.८१% एवढ्या मतदानाची टक्केवारी झाली होती. मात्र, आतापर्यंतच्या मतदान टक्केवारीच्या आढावानुसार सन १९८९ मध्ये झालेली मतदानाची ६६.२% एवढी टक्केवारी पाहता या टक्केवारीचा अद्यापपर्यंत विक्रम मोडलेला नसल्याने सन १९८९ची पुनरावृत्ती २०२४ मध्ये होणार का? असा सवाल सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे. त्यातच उष्णतेची तीव्रता लक्षात घेता साधारणपणे ६२% च्यावर मतदान जाणार नाही असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वच पक्ष मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्यांबरोबरच शीतपेय व आईस्क्रीम यासोबत वातानुकूलित गाडीतून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी तयारीला लागले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!