• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बॅटने डोक्यात मारून खुन केल्या प्रकरणी आरोपीस जन्मठेप; रोहा तालुक्यातील घटना

ByEditor

May 2, 2024

माणगाव जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दंड व शिक्षा

सलीम शेख
माणगाव :
घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, मौजे पिंगळसई, ता. रोहा, जि. रायगड येथे दि. २२ जून २०१४ रोजी प्राथमिक शाळा पिंगळसई समोरील पटांगणात सदरची घटना घडली होती. सदर दिवशी पिंगळसई गावातील मुले क्रिकेट खेळत असताना वाईड बॉलवरून मयत विनोद बामणे व आरोपी गणेश राजेंद्र खेरटकर यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाचा राग मनात धरून आरोपी गणेश खेरटकर याने मयत विनोद विठोबा बामणे याच्या डोक्यात बॅटने तीन ते चार वेळा मारल्याने विनोदला गंभीर दुखापत होवुन तो बेशुध्द पडला. त्याच्यावर रोहा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता मुंबई येथे नेत असताना वाटेतच त्याचा पेण येथे मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

या घटनेबाबत मयताचा भाऊ विशाल विठोबा बामणे रा. पिंगळसई याने रोहा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. आरोपी गणेश खेरटकर याच्यावर रोहा पोलीस ठाण्यात गु.र. नं. २८/२०१४ भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी कौशल्याने पुर्ण करून आरोपी विरुध्द् मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी विशेष सरकारी वकील सतीश म्हात्रे यांनी सरकार पक्षातर्फे एकुण १० साक्षीदार तपासले. सदर पुराव्यामध्ये फिर्यादी विशाल बामणे तसेच घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार गणेश बावकर, पिंगळसई व वैद्यकिय पुरावा, पंचाच्या साक्षीचा पुरावा मा. सत्र न्यायाधीश हर्षल किसन भालेराव सत्र न्यायालय माणगाव यांनी ग्राह्य धरून आरोपी यास विनोद बामणे खुन प्रकरणी भादवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवुन आरोपी गणेश राजेंद्र खेरटकर यास आजन्म कारावासाची (जन्मठेप) शिक्षा ठोठावली. या शिक्षेबरोबर द्रव्यदंड रूपये २५०००/- व मयताची विधवा व तिची लहान मुलगी यांना १,५०,०००/- रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश मा. सत्र न्यायालयाने दिला आहे.

सन २०१४ पासुन हे प्रकरण मा. जिल्हा सत्र न्यायालय माणगाव कोर्टात न्यायासाठी प्रलंबित होते. फिर्यादीचे वतीने या प्रकरणाच्या सुनावणीकरिता मयताचा छोटा भाऊ विशाल विठोबा बामणे यांनी सरकार दरबारी विशेष प्रयत्न करून नामांकित वकील सतिश म्हात्रे यांची या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणुन नेमणुक करावी अशी मागणी सरकारकडे केली होती व ती मागणी मान्य होवुन सदर प्रकरणामध्ये फिर्यादीचे वतीने वकील सतीश म्हात्रे व आरोपी गणेश खेरटकर यांच्या वतीने मनोजकुमार शिंदे हे वकील म्हणुन काम पाहत होते. आरोपी हा धाटाव एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीमध्ये कार्यरत होता. मयत विनोद बामणे याच्या पश्चात त्याची विधवा पत्नी व दीड वर्षाची छोटी मुलगी असा त्यांचा परिवार पुर्णपणे बेघर झाला होता. परंतु, मयताचा छोटा भाऊ विशाल याने हिंमत न हारता अगदी चिकाटीने व जिद्दीने आपली सत्याची बाजू लावुन धरून वेळोवेळी संयम दाखवुन, न डगमगता घरातील छोटा असुन कमी वयात देखील एक जबाबदार व्यक्ती म्हणुन एक कर्त्या पुरुषाची भुमिका घेवुन वहिनी व छोट्या पुतणीच्या मागे ठाम राहुन या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला व त्याचे फलित म्हणुन दिर्घकाळ अशा १० वर्षांनी मा. न्यायाधिश भालेराव साहेब जिल्हा सत्र न्यायालय माणगाव कोर्टाचा निकाल शुक्रवार, दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सत्याच्या बाजूने लागला. बामणे कुटूंबियांना न्यायालयाकडून जी न्यायाची अपेक्षा होती ती त्यांना मिळाली.

दिर्घकाळ चाललेल्या या खटल्याचा निकाल सत्याच्या बाजूने लागल्यामुळे सर्व परिसरात याबाबत “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही” असे बोलले जात आहे. या खटल्यामध्ये ज्यांनी विशेष सरकारी वकील म्हणुन आपली जी महत्वाची भूमिका निभावली असे वकील सतिश म्हात्रे यांचे देखिल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सत्याच्या बाजूने लढणारे व गोरगरिबांना न्याय मिळवुन देणारे अशी त्यांची ख्याती सर्वत्र आहे व ते आज या खुनाच्या खटल्यामध्ये सिध्द झाले. त्याबद्दल त्यांचे व पोलिसांचे विशेष अभिनंदन व त्यांचे सदैव ऋणी असल्याचे मृताचा भाऊ विशाल याने सांगितले. भाऊ नसल्याचे दुःख मनात असुनही त्यांच्या पश्चात त्याला न्याय मिळाला. त्यामुळे न्यायालय व न्यायदेवतेचे न्यायरूपी अशिर्वाद मिळाले असे बामणे कुटूंबीय यांनी या ठिकाणी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!