किती रोजगार निर्मिती केली याचा हिशेब गीतेंनी जनतेला द्यावा -रुपाली चाकणकर
बोर्ली पंचतन येथे महिला मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद
अभय पाटील
बोर्ली पंचतन : विरोधक पाकीट देऊन गर्दी जमवत आहेत. जेवढे पाकीट जड तेवढे तोंडातून फेस येईपर्यंत भाषण अशी विरोधकांवर टीका करतानाच तीस वर्षाच्या खासदरकी व दोन वेळा मंत्री पदाच्या कालावधीत किती उद्योग रायगडमध्ये आणले? किती रोजगार निर्मिती केली याचा हिशेब गीतेंनी द्यावा मगच मत मागण्यासाठी जनतेकडे जावे असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या.

बोर्ली पंचतन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास बोर्ली पंचतन जिल्हा परिषद गटातून हजारो महिला उपस्थित होत्या. या सभेस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती तर त्यांच्या समवेत विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष महमद मेमन, माजी जिल्हा परिषद सदस्य शामकांत भोकरे, मंदार तोडणकर, माजी सभापती स्वाती पाटील, देविदास कावळे, महिला तालुका अध्यक्ष सबा फिरफिरे, बोर्ली पंचतन सरपंच ज्योती परकर, माजी सरपंच ज्योत्स्ना हेदुकर, संजीवनी श्रीवर्धनकर, ग्रामपंचायत सदस्या प्रिया पाटील, समिधा तोडणकर, निर्मला कांदेकर तसेच इतर महिला पदाधिकारी व शेखाडीपासून दिघीपर्यंत जिल्हा परिषद गटातील असंख्य महिला वर्ग मेळाव्यास उपस्थित होत्या.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे म्हणले की, काही दिवसांपूर्वी याच सभागृहात विरोधकांची बैठक झाली. त्यावेळी पैसे देऊन गर्दी जमविण्याचा प्रयत्न केला. पण मोजकीच लोक होती. पण आजच्या ह्या आपल्या महिलांच्या मेळाव्याने विरोधकांना मत मागण्यासाठी घर शिल्लक राहिलेलं नाही असा टोला आमदार अनिकेत तटकरे यांनी अनंत गीते यांना लगावला. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात उपस्थित महिलांना संबोधित करताना सांगितले की, श्रीवर्धनमधून एकवटलेली हीच महिला शक्ती सुनील तटकरे यांच्या मागे मोठी ताकद उभी करून जास्त मताधिक्य इथून मिळेल अशी खात्री व्यक्त केली तसेच गुलाल आपणच उधळणार, बारामतीचा गुलाल उधळून रायगडमध्ये देखील गुलाल उधलायला येणार तेव्हा विरोधकांना पण गुलाल खेळायला आपल्यासोबत बोलवा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने लागू केलेला सीएए कायदा हा आपणा सर्वांना नागरिकत्वाची जबाबदारी देणारा कायदा आहे. याबाबत विरोधक वेगवेगळ्या प्रकरच्या अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत. त्या अफवांना थारा देऊ नका असे आवाहन करताना जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत संविधान कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या, संकटवेळी पाठीशी उभे राहणाऱ्या, विकासकामांसाठी व कोकणच्या विकासासाठी सतत धडपडणाऱ्या सुनील तटकरे यांना पुन्हा लोकसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.