ऐन उन्हाळ्यात नागरिकांवर अतिरिक्त भार, याला जबाबदार कोण?
विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील आंबेवाडी व वरसगांव नाका येथील पोलावरील लाईट गेली आठ दिवसापासून दिवसरात्र सुरुच असून याचा ऐन उन्हाळ्यात येथील सर्वसामान्य नागरिकांना अतिरिक्त भार म्हणून फटका बसणार असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न येथील रहिवाशी नागरिकांकडून केला जात आहे.
सर्व कार्यकर्ते हे निवडणूक प्रचारात गुंतले असून त्यांना अशा महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. परंतु, ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक ग्राहकांना बसला असुन १ एप्रिल २०२४ पासून वीज बिलात ७.५० टक्के वाढ करण्यात आली असून आता घरगुती वापरासाठी सरासरी २५ ते ५० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. राज्यात उन्हाचे चटके बसत असताना महाराष्ट्र वितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडून वीजदर वाढीचा निर्णय घेण्यात आला असून या सोबत स्थिर आकारात १० टक्के वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत संबंधितांच्या दुर्लक्षामुळे विद्युत पोलावरील दिवे दिवसरात्र सुरु ठेवल्याने याचा नाहक भुर्दंड येथील रहिवाशांना बसणार असून, संबंधितांनी अशा गोष्टीकडे लक्ष द्यावे असे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे.