• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पर्यटक चाकरमान्यांची महामार्गावर रखडपट्टी!

ByEditor

May 11, 2024

इंदापूर माणगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रवाशांना बसला फटका

सलीम शेख
माणगाव :
मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर शहरातील बाजारपेठेतील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होत नाही. त्यामुळे या शहराच्या दोनही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच रांगा लागल्या असल्याने तब्बल एक महिन्यापासून वाहतूक कोंडीचा फटका प्रवासी पर्यटक नागरिकांना नाहक बसत आहे. त्यामुळे इंदापूर व माणगाव मधील नागरिकांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. शनिवार-रविवार ही नित्याचीच वाहतूक कोंडी असते. त्यातच हॉलीडे आणि उन्हाळी सुट्ट्या व यावर्षीची सुरु असणारी लगीनघाई यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, सुरत येथे व परिसरात असणारा पर्यटक व चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकण व तळ कोकणात परतला आहे. उष्णतेने व्याकूळ झालेल्या पर्यटकांनी श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर, मुरुड, काशीद बीच यासह अनेक ठिकाणी समुद्रात भिजण्यासाठी मोठ्या प्रमाणात गेले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका सर्वांनाच बसला आहे.

ही वाहतूक कोंडी नित्याचीच होत असून नागरिकांची चांगलीच डोकेदुखी बनली आहे. या बाजारपेठेतील रस्ता कधी मोकळा श्वास घेणार ? असा मार्मिक सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. लोकसभेची निवडणुक रायगड व रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील पार पडली असली तरी प्रवासी नागरिकांचीही लगबग कांही कमी झाली नाही. त्यातच शाळा विद्यालयाच्या परीक्षा आटोपल्या नंतर गावी जाण्याची लगबग सुरु झाली त्यातच लग्नसराई सुरु झाल्याने नागरीकांनी गावाकडे कूच केली आहे. त्यामुळे माणगाव बाजारपेठेत पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली असून त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बाजारपेठेत दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटक नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत दिवसभर माणगावात वाहतूक कोंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. याचा फटका प्रवासी नागरिकांना चांगलाच बसला असून या वाहतूक कोंडीचे कोडे कधी सुटणार ? हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.

पुणे व पश्चिम महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी रायगडात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दरम्यानच्या काळात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यामुळे पर्यटक नागरिकांच्या उत्साहावर वाहतूक कोंडीचे पाणीच पडले. कोकण व तळ कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. दर शनिवारी – रविवारी माणगाव व इंदापूर येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या दोन्ही बाजारपेठेला बायपास काढण्याचे काम गेले अनेक वर्षापासून सुरु असून ते काम रखडले असल्याने नागरिकांना याचा नाहक फटका बसत आहे. आज सकाळपासूनच मुंबई – गोवा महामार्गावर माणगाव, इंदापूर या शहरात वाहतूक कोंडी झाली आहे. उन्हाळ्याचे सुट्या असल्याने महामार्गांनी प्रवासी नागरिकांच्या वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक संत गतीने सुरु होती. मुंबई – गोवा महामार्गावर मुंबई बाजूकडून वाहनाच्या रांगा महामार्गावर दिसत होत्या. पुणे बाजूकडून समुद्र व पर्यटना स्थळावर मौज मजा करण्यासाठी आपल्या कुटुंब व मित्रासह ग्रुप वर्षा सहलीसाठी मोठ्या प्रमाणांत आले आहेत. त्यामुळे सर्वांनाच या वाहतुक कोंडीचा फटका बसला. मुंबई – गोवा महामार्गावरील इंदापूर, माणगाव येथील बायपासचे काम पूर्ण झाल्यास माणगावमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल. अशी आशा नागरिकांना वाटत असून हि वाहतूक सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच महामार्ग पोलीस व माणगाव पोलीस विशेष प्रयत्न करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!