घनःश्याम कडू
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील असे नामांतर केले जाईल असा कांगावा प्रचार सभांमध्ये दोन्ही उमेदवार व त्यांच्या नेतेमंडळींकडून केला जात आहे. परंतु, खरोखर निवडून आल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ असे नामाकरण होईल की नाही याची शाश्वती जनतेला राहिली नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
गेली अनेक वर्षांपासून नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. या विमानतळाच्या नामकरणावरून वादंग उठले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या महाविकास आघाडीने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केला होता. त्यानंतर नाट्यमय राजकीय घडामोडी होऊन सरकार कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. त्यांनी हा ठराव रद्द करून पुन्हा नव्याने ठराव घेतला होता. त्याला आता जवळपास दीड ते दोन वर्ष होऊनही आजतागायत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यात आलेले नाही.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा वापर करून मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही उमेदवार व त्यांच्या पक्षाकडून प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे सरकारने ठराव घेऊन आज कित्येक महिने उलटूनही पुढील कोणतीच सोपस्कार झालेले दिसत नाही. मात्र, प्रचारात उरण मतदारसंघात हा प्रमुख मुद्दा बनलेला दिसत आहे.
मतदानासाठी काही तासांचा अवधी उरला आहे. निवडणूक झाल्यावर निवडून येणारा उमेदवार अथवा त्यांचे पक्ष यासाठी कशावरून पाठपुरावा करतील? अशी चर्चा दबक्या आवाजात उरणच्या मतदारात सुरू आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव विमानतळास देण्याचा ठराव घेण्याची शक्यताही उरणच्या जनतेत सुरू आहे. म्हणून उरणच्या मतदारांनी जागृत राहून मतदान करावे.