• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

ByEditor

May 13, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
दिनांक ६ मे २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली. ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील या समाजकंटकाने केली होती. सदर इसमावर उरण पोलीस ठाण्यात त्याने केलेल्या गुन्हयाबाबत रीतसर गुन्हा देखील नोंदविण्यात आला. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सदर इसमावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. सदर इसमावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती. मात्र, प्रत्यक्षात तसे झाली नाही. त्यामूळे संतप्त ग्रामस्थांनी मतदानाच्या दिवशीच म्हणजेच १३ मे २०२४ रोजी मतदानावरच जाहीर बहिष्कार घातला आहे. यावेळी सर्व ग्रामस्थ हनुमान मंदिरात एकत्र आले होते.

घडलेल्या घटनेबाबत सदर आरोपीवर कोणतीही कठोर कायदेशीर कारवाई झालेली नाही. जर आरोपीवर कारवाई झाली नाही तर लोकसभा निवडणुकीवर जसा बहिष्कार टाकला तसाच बहिष्कार विधानसभेच्या निवडणूकीवरही टाकण्यात येणार आहे असा इशारा आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थ मंडळाचे सचिव कृष्णा पाटील यांनी दिला. तर उपाध्यक्ष धनेश म्हात्रे यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळत नाही, ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार असल्याचे सांगितले. उपस्थित महिला ग्रामस्थ पल्लवी ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमचे ग्रामस्थांचे १७०० मतदान आहे. आम्हाला न्याय न मिळाल्याने तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने आम्ही मतदान करणार नाही. हे असेच चालू राहिले तर १७०० मतदार पुढील विधानसभेच्या निवडणूकीत मतदान करणार नाहीत अशी माहिती पल्लवी ठाकूर यांनी दिली. सदर बहिष्काराबाबत गावातील सर्व ग्रामस्थ आगरी कोंढरीपाडा येथील श्री हनुमान मंदिरात एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी एकमुखी निर्णय घेत मतदानावर बहिष्कार घातला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!