• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली

ByEditor

May 14, 2024

शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्या प्रयत्नांना यश

मिलिंद माने
मुंबई :
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किशन मोरे व शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांनी दिल्लीत जाऊन भारतीय निर्वाचन आयोगाकडे केलेल्या मागणीला यश आले असून तूर्तास केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निवडणुकीचा कार्यक्रम मागे घेतला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 10 जून रोजी या निवडणुका पार पाडणार होत्या. अनेक शिक्षक लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र आहेत. ते निवडणुकीनंतर सुट्टीवर जाणार असल्यानं या निवडणुकीला शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने २ मे ते १४ जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केला आहे व 15 जूननंतर राज्यात शाळा चालू होणार होत्या. त्यातच १७ ते २० जूनपर्यंत बकरी ईदनिमित्त उर्दू माध्यमाच्या शाळांना सुट्टी असते. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक ११ जून २०२४ रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच अनेक शिक्षक निवडणुकीच्या कामानंतर आपापल्या मूळ गावी सुट्टीवर जाणार आहेत. त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहू शकतात ही बाब शिक्षक भारतीच्यावतीने निवडणूक आयोग व हायकोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील दोन पदवीधर व दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम तुर्त पुढे ढकलला असून त्याबाबतचे परिपत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिक्षक मतदार संघातील व त्याबरोबरच पदवीधर मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला आहे.

राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदार संघातील जा रिक्त जागांसाठी निवडणुका होत आहेत त्यां आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपत आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील या चार जागांसाठी १० जूनला मतदान होणार होते. राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेतील एकूण सदस्यांपैकी सात सदस्य शिक्षक तर सात सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून जातात. त्यातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार १० जूनला मतदान होणार होते तर 13 जूनला मतदान मतमोजणी होणार होती. यासाठी १५ मे पासून निवडणुकीची प्रक्रिया चालू होणार होती. २२ मेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी आपले नाम निर्देशन पत्र दाखल करावयाचे होते. त्या दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी २४ मे रोजी होणार होती तर २७ मेपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार होते.

राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांचा कार्यकाळ सात जुलैला संपत आहे. त्यातील मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेले विलास विनायक पोतनीस व कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेले निरंजन वसंत डावखरे तर नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर भिकाजी दराडे व मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल हरिश्चंद्र पाटील या आमदारांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने तूर्तास या चारी जागांचा निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला असून लोकसभेच्या निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर पुन्हा या चार जागांसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!