विशेष प्रतिनिधी
अलिबाग : तालुक्यातील उमटे धरणातील साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधार्याची तात्काळ डागडुजी करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसिलदार अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना निवेदन दिले.

उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरीत झाले. त्यामुळे धरणाची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेवर आहे. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफुट आहे. पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. सद्यस्थितीत मोठया प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता सुमारे 30 दशलक्ष घनफुट आहे. धरणाच्या पाण्यावर 47 गावे व 33 आदिवासी वाड्या असून पिण्याच्या पाण्यावर ही गावं अवलंबून असून हे पाणी पुरवठा करणारे एकमेव धरण आहे. धरणाचा गाळ हा मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे डिसेंबर महिन्यातच पाणी कपातीला सुरुवात होते. धरणावर अवलंबून असणार्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. उमटे धरणाचा गाळ काढून मुबलक प्रमाणात पाणी देण्याची जबाबदारी ही शासनाचीच असताना शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
मागच्या सन 2021च्या पावसाळयामध्ये कोरोना काळामध्ये उमटे धरणाच्या फिल्टर प्लांटमध्ये एक आदिवासी बांधव पडून मरण पावला. त्याचे प्रेत फिल्टर प्लांटमध्ये आठ दिवस कुजून पडले होते आणि तेच दुषित पाणी आठ दिवस लोकांना पाजण्याचे पाप रायगड जिल्हा पाणी पुरवठा विभागाने केले आहे. उमटे धरणाच्या पाण्याचा आणि गाळाचा प्रश्न सुटला नाही तर या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले नागरिक, महिला आता शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पाव़ित्र्यात आहेत.
पाणी पुरवठा अधिकारी या नात्याने आपण गाळ, काढण्याच्या बाबतीत जिल्हा पाणीपुरवठा विभाग, तसेच जिल्हापरिषदेला आदेश द्यावेत तसेच शासनाचे तज्ञ इंजिनियर यांचे मार्गदर्शनाखाली धरणाचा गाळ काढण्यात यावा तसेच सदरचा गाळ काढण्यासाठी आपण तात्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा. उमटे धरणाचा मागील 46 वर्षापासून गाळच काढलेला नाही. सदरचा गाळ काढून नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी देण्याची नैतिक जबाबदारी आपण घ्यावी. उमटे धरणाच्या पाण्याचा आणि गाळाचा प्रश्न सुटला नाही तर या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले 44 गावातील आणि 33 आदिवासी वाड्यांतील नागरिक, महिला शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे पत्र उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
उमटेे धरणाचा गाळ व मुबलक पिण्यायोग्य पाणी देण्याच्या बाबतीत रा. जि. प. व लघु पाठबंधारे विभाग अपयशी ठरला आहे. सदरच्या गाळाच्या संदर्भात प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर 47 गावे व 33 आदिवासी वाड्यांतील नागरिक शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. शासनाने पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.
-अॅड. राकेश पाटील,
उमटे धरण संघर्ष ग्रुप.
धरणाच्या गावाच्या प्रश्नासंदर्भात आम्ही उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून गावपातळीवर लोकांचे प्रबोधन करत असून शासनाने पाण्याचा प्रश्न हा माणसांचा प्रश्न म्हणून समजून तात्काळ गाळ काढून शासन तत्पर आहे याची पोच पावती द्यावी.
-नंदेश गावंड
रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील एकमेव धरण उमटे हे आज शेवटची घटका मोजतंय. धरणाच्या भिंतीची परिस्थिती अतिशय दयनिय झाली असून त्याचे दगड निखळले आहेत. त्यामुळे सदर मातीच्या बंधार्याजवळ 50 हून अधिक ठिकाणी भगदाडं पडली असून धरण पुर्ण भरल्यानंतर त्यातून पाण्याचा निचरा होत आहे. धरणाचा बंधारा मातीचा असल्यामुळे तो कधी फुटेल याचा नेम नाही. असे झाल्यास विभागांतील सहा गावे पुर्णपणे पाण्याखाली जातील. धरण गाळाने पुर्णपणे भरलेले असून आज गेली 40 वर्ष गाळ काढलेला नाही. पाण्याची क्षमता अत्यंत कमी झाल्यामुळे 5 ते 7 दिवसाआड पाणी पुरवले जात आहे तेही दुर्गंधीयुक्त आहे. ढिम्म प्रशासन गली 8 वर्षे त्यांच्या नजरेत आणून सुद्धा दुर्लक्ष करीत आहे व येथील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. लोक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
-अॅड. मधुकर वाजंत्री
सल्लागार