विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पुई गावापासून आंबेवाडी नाक्यापर्यंत चौपदरीकरणाचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत असल्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन यामुळे तीन ते चार तास वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने प्रवाशांचा खोळंबा होताना दिसत आहे.
सद्या वातावरणात प्रचंड गर्मी जाणवू लागल्यामुळे अंगाचा दाह कमी करण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे येथील चाकरमानी कोकणात हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिघी, रत्नागिरी तसेच गोवा येथील समूद्रावर गर्दी करीत आहेत. याशिवाय शनिवार, रविवारी असणाऱ्या सुट्ट्या यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहनांची संख्या अधिक वाढली आहे. यात भरीत भर आंबेवाडी नाक्यावरील काही दिवसापूर्वी सुरु केलेल्या उड्डाणपुलाचे काम यामुळे पुई गावाच्या हद्दीपासून दोन किलोमीटर अंतरावर आंबेवाडी नाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने उन्हाच्या झळा सहन करीत प्रवाश्यांना ताटकळत राहावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पंधरा वर्षांपासून अर्धवट स्थितीत असुन अद्यापही या कामात प्रगती नाही. शिवाय आंबेवाडी बाजारपेठेतील चौपदरीकरणाचे काम तसेच उड्डाण पुलाचे काम पंधरा वर्षानंतर सुरु केले आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. किती ठेकेदार आले किती गेले रस्त्याचे काम मात्र मार्गी लागत नाही. महामार्ग पूर्ण होण्यासाठी लोकनेत्यांकडून फक्त तारीख पे तारीख दिली जाते परंतु महामार्गाच्या कामात कोणतीही प्रगती नाही. काही दिवसापूर्वी हे काम जुनपर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते मात्र कामाचा वेग पाहता हि डेडलाईन देखील टळून जाणार आहे. यामध्ये ठेकेदारावर प्रशासनाचा वचक नसल्यामुळे फक्त मनमानी सुरु आहे. “रोज मरे त्याला कोण रडे” अशीच परिस्थिती असून या वाहतूक कोंडीमुळे तीन-चार तास उन्हात थांबून कोणाचा तरी नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवासी वर्गातून केला जात आहे.