विठ्ठल ममताबादे
उरण : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची केंद्रीय कार्यकारणीची बैठक शनिवार, रविवार २५ व २६ मे २०२४ रोजी वासुदेवानंद हॉल कुडाळ सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध विषयांवर सरकारने सकारात्मक भुमिका घेवून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यात “सरकार जगाव” अभियान आयोजित करून न्याय हक्कांकरिता आंदोलनात्मक मार्गांचा अवलंब करेल असा इशारा सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.

भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी दीप प्रज्वलन केले. विधानसभेपुर्वी संघर्षासाठी कामगारांनी तयारी सुरू करावी. शासन कामगारांसाठी असते, कंत्राटी पद्धत बंदची मागणी रास्त असल्याचे ते म्हणाले. अनेक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा संघटन मंत्री व जिल्हा कोषाध्यक्ष या बैठकीस उपस्थित होते.
कृती समितीच्या केंद्रस्थानी कंत्राटी कामगार असावा त्यात राजकारण असता कामा नये. वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहीत शाश्वत रोजगार, सामाजिक सुरक्षा व लिविंग वेजेस मिळावे, भरती प्रकीयेमध्ये वयात सवलत, आरक्षण मिळावे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे मत महामंत्री सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले.
ई.एस.आय सी, पीएफ व वीज कंपनी कार्यालयात असलेल्या प्रलंबित तक्रारीबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जुलैमध्ये “सरकार जगाव” अभियान राबवून प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी कामगारांचे मेळावे घेऊन संघटन मजबूत करण्याचे आवाहन संघटन मंत्री उमेश आनेराव यांनी केले.
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्यानंतर देखील महावितरणचे व्यवस्थापकीय संचालकांनी वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी ५ जून पूर्वी कंत्राटी कामगार संघासोबत मीटिंग न घेतल्यास वीज कंपनीच्या वर्धापन दिनी म्हणजे ६ जून २०२४ रोजी राज्यभरातील कंत्राटी कामगार काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त करतील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी केले तर सूत्रसंचलन राहुल बोडके यांनी केले.