सलीम शेख
माणगांव : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली १३ वर्ष सुरू आहे. अद्यापही अनेक टप्प्याचे काम अपूर्ण आहे. मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका देखील सुरूच आहे. लवकरात लवकर मुंबई गोवा महामार्ग व्हावा यासाठी मंगळवार, दि. ४ जुलै २०२३ रोजी माणगांवमध्ये मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या पुढाकाराने माणगांव आगार ते प्रांताधिकारी कार्यालय अशी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘पदयात्रा’ काढण्यात आली.
नव्याने रुजू झालेले प्रांताधिकारी संदीपान सानप यांना निवेदन देऊन पदयात्रेची सांगता करण्यात आली. या पदयात्रेत मोठ्या संख्येने माणगांवकर व जनता सामिल झाली होती. महामार्गाकडे कोणीच लक्ष देत नाही आणि राजकारण होत असल्याबाबत जनआक्रोश समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष रणपिसे यांना छेडले असता, महामार्गाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत सर्वांना सोबत घेऊन लढा लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोकणकर गेले १३ वर्षापासून मुंबई गोवा महामार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. तसेच दुर्दैवाने एखादा अपघात घडला किंवा एखाद्या आजारी व्यक्तीला मुंबईत पुढील उपचारासाठी घेऊन जाता येताना अशा खड्डेमय महामार्गामुळेच रस्त्यातच जीव गमवावा लागतो.
जर समृध्दी सारखा महामार्ग अवघ्या ५ वर्षात सुविधांसह सुसज्ज बनु शकतो. परंतु आपला महामार्ग गेली १३ वर्ष उलटून देखील पूर्ण होण्याचे चित्र अजिबात दिसत नाही. आज कोकण हे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. पण सुसज्ज अशा सोई-सुविधा नसल्याने विकास खुंटला आहे. यामुळेच कोकणातील ग्रामीण भाग दिवसेंदिवस ओसाड होत चालला आहे. याला मुख्य कारण म्हणजे कोकणातील दळणवळण सुविधा दूर्लक्षीत आहेत. यावर्षी पहिल्या २ दिवसांच्या पावसाने सालाबाद प्रमाणे यंदाही महामार्गाची पार दयनीय अवस्था झालेली आहे.