• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण नगरपरिषदेसह १७ ग्रामपंचायतींनी थकविले ५९ कोटी ३० लाख रूपयांचे पाणी बिल

ByEditor

May 29, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील २० ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या २० पैकी १७ ग्रामपंचायतींनी एमआयडीसीचे गेले कित्येक वर्षे पाणी बिल भरले नसल्याने त्यांच्याकडे कोट्यावधी रूपयांची पाणी बिलाची थकबाकी आहे. या ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची मार्च २०२४ अखेर पाणी बिलाची २७ कोटी ६३ लाख ३४ हजार १५५ रुपये इतकी थकबाकी आहे. तसेच उरण नगर परिषदेकडे ३१ कोटी ६७ लाख ०५ हजार १७१ रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या विकासकामांना गती मिळत नाही.

उरण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि २० ग्रामपंचायत हद्दीतील गावातील रहिवाशांना एमआयडीसीच्या माध्यमातून रानसई धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी थकबाकीदार ग्रामपंचायती या नागरिकांकडून नित्यनियमाने पाणीपट्टी वसूल करण्याचे काम करत आहेत. तसेच जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल, महावितरण कंपनी, इतर प्रकल्पासह गाव परिसरात निर्माण झालेल्या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदाम यार्डमूळे अनेक ग्रामपंचायती या आर्थिकदृष्ट्या सधन झाल्या आहेत. मात्र, तरीही एमआयडीसीला पाण्याचे बील भरण्यामध्ये टाळाटाळ केली जाते. त्यामुळे या ग्राममपंचायतींकडे कोट्यावधींची थकबाकी साठून राहत असल्याचे दिसून येत आहे. या ग्रामपंचायतीने थकबाकी भरल्यास त्यांची मिटर नादरूस्त दंड, मंजूर कोटा दंड, मिटर भाडे आणि विलंब शुल्क माफ करण्याचे एमआयडीसीने या अगोदर जाहिरही केले आहे. मात्र, ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक हे जाणूनबुजून पाणी बिल भरण्यासाठी चालढकलपणा करत आहेत. अशी बाब थकीत पाणीपट्टीच्या माध्यमातून समोर येत आहे.

तालुक्यातील नवीन शेवा – १ कोटी ११ लाख ८४ हजार ११५, हनुमान कोळीवाडा – ४२ लाख ६६ हजार ९९६, करळ – ९७ लाख ४८ हजार २७६, धुतुम – १ कोटी ४१ लाख ९३ हजार ९४४, जसखार – २ कोटी २४ लाख ५९ हजार १६२, बोकडविरा – १४ लाख ५९ हजार ७९६, फुंडे – ३ कोटी ३६ लाख ९६ हजार ३२६, सावरखार – ६० लाख ६३ हजार २७१, डोंगरी – ६८ लाख ३३ हजार ४७७, सोनारी – ३४ लाख ८१ हजार ९८२, भेंडखळ – १५ हजार ५९३, नागाव – १ कोटी ६१ लाख ७४ हजार ४५०, चाणजे – ९ लाख ११ लाख ८७ हजार ८४५, पाणजे ९ लाख ११ हजार २२७, चिर्ले – २ कोटी ३० लाख २१ हजार २६९, केगाव – २ कोटी २० लाख ९५ हजार २०५, म्हातवली – ९५ लाख ४१ हजार २२२ या १७ औद्योगिकीकरण आणि सिडकोच्या हद्दीतील ग्रामपंचायतींनी एमआयडीसीचे करोडो रुपये थकवले आहेत. तसेच उरण नगर परिषदेकडे ३१ कोटी ६७ लाख ०५ हजार १७१ रुपयांची थकबाकी आहे.

पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटीसाही बजावण्यात येत आहेत. तसेच वारंवार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनाही या संदर्भात माहिती देण्यात येत आहे. सोनारी ग्रामपंचायतकडून थकीत बिलाची रक्कम भरण्यात आली असल्याने सदर ग्रामपंचायतीच्या बिलात सुट देण्यात आली. जर उर्वरित ग्रामपंचायतीने थकीत बिलाची रक्कम भरण्यास पुढाकार घेतला तर त्यांनाही बिलात सुट देण्यात येणार आहे. मात्र, असे असतानाही थकबाकीदार ग्रामपंचायतीकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याचा फटका हा एमआयडीसीच्या विकास कामांना निश्चित बसत आहे. अशी माहिती एमआयडीसीचे उप अभियंता वि. पां. पाचपुंडे यांनी दिली. तसेच थकबाकीदार ग्रामपंचायतीनी देयके भरल्यास त्यांची दंडाची, मिटर नादुरस्त शुल्क, विलंब शुल्क आदी माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीनी आपली पाणीपट्टी लवकरात लवकर भरावी असे आवाहन उप अभियंता वि. पां. पाचपुंडे यांनी तालुक्यातील थकबाकीदार ग्रामपंचायतीना केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!