• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळयात पाणी प्रश्न पेटला!

ByEditor

May 29, 2024

अधिकारी आणि पत्रकार यांची समन्वय बैठक

तातडीने उपाय योजना करण्याचा पत्रकारांचा इशारा

वैभव कळस
म्हसळा :
तालुक्यातील जनतेला पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून जलजीवन योजनेअंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्च करूनही टंचाई पुर्व कालावधीत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्या नसल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. योजना कार्यान्वित करण्यात जिल्हा पाणी पुरवठा विभाग आणि संबंधीत ठेकेदारांकडून नियोजनाचा अभाव आणि हलगर्जीपणा होत असल्याचे ग्रामस्थांनी तक्रार अर्ज करून वृत्तपत्रात छापून निदर्शनास आणून दिले असता यावर कायम उपाययोजना व्हावी या उद्देशाने म्हसळा तालुका पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे. शासकीय अधिकाऱ्यांकडे चर्चा करून तो सोडवणुकीसाठी संयुक्त बैठक घेऊन समन्वय साधला आहे.

म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत तालुका तहसीलदार समीर घारे, पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव जाधव, नगरपंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, पाणी पुरवठा अभियंता यशवंत बागकर, जेई श्री. माळी, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, प्रेस क्लब अध्यक्ष बाबु शिर्के, पत्रकार उदय कळस, अशोक काते, सुशिल यादव, श्रीकांत बिरवाडकर, अंकुश गाणेकर, वैभव कळस आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांनी चर्चेत भाग घेतला होता. सद्यस्थितीत टंचाई परिस्थिती असलेल्या गावांमध्ये मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करणे हा एकमेव उपाय असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. म्हसळा तहसीलदार समीर घारे आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे ४ ग्रामपंचायतीमधील गावांचे प्रस्ताव सादर केले आहेत तर आणखी सहा ग्रामपंचायतीने टँकरची मागणी केली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. बैठकीत पत्रकारांनी रायगड जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग कार्यालय म्हसळा आणि पाणी पुरवठा ठेकेदार यांनी योजनेतील चुकीचे कामे केली असल्याचे निदर्शनास आणून दिले असता ती आता पुर्ण होणार नसल्याने म्हसळा तालुक्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे.

“हर घर जल” या शासनाच्या ध्येय धोरणानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातुन राज्याच्या महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांचे विशेष प्रयत्नाने म्हसळा तालुक्यात किमान १०० कोटी रुपयांची तरतूद करून तालुक्यात अनेक गाव, वाडी, वस्तीवर जलजीवन योजनेअंतर्गत ६० योजनांना मंजुरी मिळाली आहे. यातील २१ योजना कार्यान्वित झाल्या आहेत तर काही योजनांचे काम कमी अधिक प्रमाणात झाले असल्याचे सांगण्यात आले. मंजुर योजनेत तांत्रिक त्रुटी, स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडीअडचणी आणि योजना कार्यान्वित करणाऱ्या ठेकेदारांनी दिरंगाई केल्याने म्हसळा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे.

टँकरमुक्त म्हसळा तालुक्यात आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ तालुका प्रशासनावर आली आहे. टँकरमुक्त असलेल्या म्हसळा तालुक्यात पाणी पुरवठा विभागाचे योग्य समन्वय व नियोजन नसल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीने म्हसळा तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी श्री. जाधव यांच्याकडे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. पावसाळा तोंडावर आला असला तरी तो बंगालमध्ये झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम होऊन पाऊस लांबणीवर जाणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.

पावसाळा सुरू होण्यास बराच वेळ जाणार असल्याने तालुका प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना लागलीच पाणी पुरवठा करावा अशी रास्त मागणी तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!