ग्रामपंचायत कार्यालयात घडली घटना, जिल्ह्यात खळबळ
गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेली कोल्हारे ग्रामपंचायत एका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आली आहे. कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयातच हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच महेश विरले हे गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्यानेच हा हल्ला केला आहे. महेश विरले यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरपंच विरले यांच्यासह इतर दोघांना मारहाण झाली आहे. दरम्यान, या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ३१ मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोरमअभावी ती तहकूब करण्यात आली. ग्रामसभा तहकुब झाल्यानंतर सरपंच महेश विरले, तंटामुक्ती अध्यक्ष पपेश विरले हे ग्रामपंचायत कार्यालयात बसले होते. त्याचवेळी ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे हे रस्त्याच्या बांधकामाला ग्रामपंचायतीने नोटीस काढल्याचा राग धरून सरपंच महेश विरले यांना शिवीगाळी करून जीवेठार मारण्याची धमकी देऊ लागले. मात्र, विरले यांनी याकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या दालनामध्ये काम करत बसले. त्यामुळे विजय हजारे, दिव्यासु चंद्रकांत हजारे, चंद्रकांत हजारे व रामचंद्र हजारे हे तिथे दाखल झाले. विजय हजारे यांनी त्याचे हातात लाकडी दांडका घेवुन महेश विरले यांना आता खल्लास केल्याशिवाय सोडणार नाही असे बोलुन लाकडी दांडक्याने प्रहार करण्यास सुरुवात केली. तर अचानक झालेल्या या गोंधळामुळे सरपंच महेश विरले हे गोंधळून गेले. त्याच दरम्यान त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार झाले. दिव्यासु हजारे यांनी देखिल विरले यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन दुखापत केली. दरम्यान, हा गोंधळ पाहून तंटामुक्ती अध्यक्ष पपेश विरले व सोमनाथ विरले हे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांना इतर दोघांनी लाकडी दांडक्यानी मारहाण केली. त्यामुळे सोमनाथ विरले यांचा हात मोडला आहे तर पपेश विरले यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान नेरळ पोलिसांनी याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२४ भारतीय दंड विधान कलम ३२६, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये विजय हजारे, दिव्यासु चंद्रकांत हजारे, चंद्रकांत हजारे व रामचंद्र हजारे यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तर यातील महत्वाची बाब म्हणजे विजय हजारे यांनी दिनांक ३० मे रोजी आपण कायदा हातात घेणार असे जाहीर वक्तव्य सोशल मीडियावर केलं होत. या घटनेनंतर सरपंच महेश विरले यांना जबर दुखापत झाल्याने बदलापूर येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जबर मार लागल्याने काही तास विरले यांची शुद्ध हरपली होती.