नवी मुंबई : एका महिलेला स्वस्तदरात सोने देण्याचे आमिष दाखवून सुमारे २८ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दरोड्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नेरुळ येथील ३६ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला असता त्याने बाजारभावापेक्षा कमी म्हणजे २७ लाख ८१ हजार रुपयांना अर्धा किलो सोने मिळवू शकतो, असे सांगितले.
१८ मे रोजी या व्यक्तीने फिर्यादी महिलेला कारने सानपाडा स्थानकात नेले. त्यानंतर त्याठिकाणी काही जण पोहोचले आणि त्यांनी महिलेला धमकावून तिच्या हातातली पैशांची बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी विविध माहितीच्या आधारे महिलेच्या संपर्कात असलेला ठाण्यातील रहिवासी राकेश शिवाजी शिंगटे (३९) आणि रूपेश सुभाष सपकाळे (४२) यांना अटक केली. इतरांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.