मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला सांभाळण्यात मोठं यश आलं आहे. मुंबईत 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. केवळ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा विजय झाला आहे. उत्तर मुंबईची जागा वगळता मुंबईतील इतर सर्व जागा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली आहेत. विशेष म्हणजे उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स राहिला. अतिशय अटीतटीची लढत या ठिकाणी झाली. अखेर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला. तर भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला.
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मुंबईत नेमकी कोणत्या राजकीय पक्षाची ताकद आहे, हे निवडणुकीशिवाय समजणार नव्हतं. खरंतर मुंबई आणि शिवसेना यांचं एक वेगळं समीकरण राहिलेलं आहे. पण शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईत यश मिळतं का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुंबईत शिवसेना पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणूक ही मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत ठाकरेंनी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाला चारी मुंड्या चित केलं आहे. मुंबईत एकूण सहा लोकसभेच्या जागा आहेत. या सहा पैकी 4 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार होते. या चारही जागांवर आपल्या उमेदवारांना विजयी करण्यात उद्धव ठाकरे यांना मोठं यश आलं आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हे उमेदवार होते. तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव या उमेदवार होते. या ठिकाणी अरविंद सावंत हे घवघवीत मतांनी विजयी झाले आहेत.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून राहुल शेवाळे हे उमेदवार होते. विशेष म्हणजे ते तिथले विद्यमान खासदार होते. तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे उमेदवार होते. या मतदारसंघात अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रविंद्र वायकर उमेदवार होते. तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर उमेदवार होते. अमोल कीर्तिकर यांचा विजय झाला आहे.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाची लढत ही अतिशय अटीतटीची ठरली. अखेर अंतिम क्षणी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा या मतदारसंघात विजय झाला.
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला आहे.
मुंबईतील केवळ एका जागेवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय झाला आहे.
पक्षात झालेल्या गद्दारीला मुंबईच्या मतदारांनी मतदानातून प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेचे 40 आमदारांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचं बंड यशस्वी ठरल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे खासदार फोडले होते. राहुल शेवाळे तब्बल 13 खासदार शिंदे गटात घेऊन गेले होते. विशेष म्हणजे त्यांनी लोकसभेचं गटनेते पद मिळवून घेतलं होतं. तर भावना गवळी यांना मुख्य प्रतोद केलं होतं. राहुल शेवाळे हे कधीकाळी मुंबईत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना खासदारकीचं तिकीट देवून त्यांचं भवितव्य उज्ज्वल केलं होतं. पण नंतर घडलेल्या घडामोडींमध्ये शेवाळे यांनी ठाकरेंकडे पाठ फिरवली होती. या सर्व घडामोडींवर आता मतदारांनी मतदानातून प्रतिक्रिया दिली आहे.