घन:श्याम कडू
उरण : जून महिना उजाडून पावसाळा सुरुवात होण्याआधीच पावसाळ्यात रानभाजी म्हणून ओळखली जाणारी शेवळाची भाजी उरणच्या बाजारात विक्रीसाठी आली आहे. शेवळाची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ड जीवनसत्त्वं असलेल्या भाज्या खूप कमी आहेत. त्यातली एक शेवळाची भाजी समजली जात आहे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी ही भाजी महत्त्वाची मानली जाते.
पावसाळा सुरु झाला की रानभाज्यांचे वेध लागतात. दाट जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या, सर्वत्र उपलब्ध न होणाऱ्या या भाज्या म्हणजे चवीची मेजवानी असतात. एका मर्यादीत कालवधीत उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या म्हणजे पोषक गुणांची खाण असतात. शेवळाच्या भाजीला जंगली सुरण असंही म्हणतात. खास मराठी लोकांच्या आहारात पावसाळ्यातल्या या शेवळाच्या भाजीला मोठं महत्त्व आहे. शेवळाच्या भाजीला इंग्रजीमधे ‘ड्रॅगन स्टॉक याम’ असं म्हणतात. महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक असलेली ही शेवळाची भाजी. ही भाजी डोंगराळ भागात दाट जंगलात येते. त्याची शेती करता येत नाही. ही भाजी एका देठासारखी दिसते. महाराष्ट्रातल्या गावाकडच्या बाजारात ही भाजी मिळते. गुणांनी पौष्टिक असलेली ही रानभाजी केवळ सात ते दहा दिवसच उपलब्ध असते. शेवळाची आमटीसारखी भाजी करुन ती भात किंवा भाकरीसोबत आवडीनं खाल्ली जाते.
या रानभाजीत आतड्यातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्याची क्षमता असते. ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. या भाजीत तंतूमय घटक जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी ही भाजी लाभदायक आहे. शेवळाची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. या भाजीमुळे आतड्यातील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते. शेवळामधे जीवनसत्त्वं, अँण्टिऑक्सिडण्टस आणि खनिजं असतात. यात B12 आणि ड जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतात. ड जीवनसत्त्वं असलेल्या भाज्या खूप कमी आहेत. त्यातली एक शेवळाची भाजी आहे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी ही भाजी महत्त्वाची मानली जाते.
शेवळाची भाजी करण्यासाठी शेवळाची एक जुडी, कांदे, लसूण, लाल मिरची, मीठ, तेल, मोहरी, हिंग, गरम मसाला, हळद, खोवलेलं ओलं नारळ एवढं जिन्नस लागतं. शेवळाची भाजी करताना देठाचा खालचा भाग काढून टाकावा आणि केवळ वरचा भागच घ्यावा. शेवळं बारीक चिरुन मग फोडणीला घालून कुकरमध्ये शिजवावी लागते. अशी ही रानभाजी समजली जाणारी शेवळाची भाजी उरणच्या बाजारात पावसाला सुरुवात होण्याआधीच विक्रीसाठी दाखल झाली आहे. आजपासून शेवळाची जुडी ही 50 रुपयाला विकली जात आहे. काही दिवसात भाजी विक्रीसाठी बाजारात जास्त प्रमाणात आल्यानंतर जुडीचा दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.