गणेश पवार
कर्जत : नेरळ टॅक्सी स्टँड येथील पुलाची अक्षरशः दूरवस्था झाली असुन, या पुलावरून जड अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात आपघात होण्याची शक्यता असल्याने सदर पुलाची दुरूस्ती व नागरी समस्यांकडे नेरळ ग्रामपंचायत व नेरळ संकुल विकास प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने सदर पुल धोकादायक अवस्थेत आहे. याकडे नेरळ ग्रामपंचायत व नेरळ संकुल विकास प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष का? व अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न मात्र करदात्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळ, ममदापूर व कोल्हारे या तीन ग्रामपंचायती या नेरळ संकुल विकास प्राधिकरण अंतर्गत येत असुन, नेरळ ग्रामपंचायत हद्दीत नेरळ संकुल विकास प्राधिकरणा अंतर्गत नागरी सुविधांची कामे सुरू आहेत. तर नेरळ बाजार पेठ ते खांडा-ममदापूर या मुख्य रस्त्यावरील नेरळ रेल्वे स्थानकाजवळील असलेल्या नेरळ टॅक्सी स्टँड येथील नाल्यावरती असलेल्या पुलाची अक्षरशः दुरवस्था झाली असुन, या पुलावरील रस्त्ता वाहून गेला आहे. पुलाच्या स्लॅबच्या लोखंडी सळई या वरती आल्या असुन मोठे खड्डे पडल्याची सध्या स्थिती आहे. या पुलावरून चारचाकी, तीनचाकी, दुचाकी तसेच आवजड वाहानांची मोठया प्रमाणात ये-जा सुरू असल्याने एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना चालताना होणारा त्रास या संदर्भात नागरिकांकडून नेरळ ग्रामपंचायत व नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांच्याकडे वारंवार सदर पूलाची दुरुस्ती करीता विनंत्या वजा तक्रारी केल्या परंतू, नागरिकांच्या तक्रारीकडे नेरळ ग्रामपंचायत व नेरळ संकुल विकास प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पुलाची सध्या असलेली दुरवस्था पाहाता, सदर पुलावर कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता असताना याकडे नेरळ ग्रामपंचायत व नेरळ संकुल विकास प्राधिकरण दुर्लक्ष का करीत आहे? अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असे सवाल करदात्या नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.