वार्ताहर
पाली : रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही देत असतो, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते, त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली व रुधिरसेतू सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १६/०६/२०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत भक्त निवास क्र. १ येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली तर्फे करण्यात आले आहे.
आपल्या शरीरात असलेल्या साडेचार ते पाच लिटर रक्तापैकी केवळ ३५० ते ४५० एम.एल. रक्तच काढून घेतले जाते. रक्तदान केल्यानंतर लिक्विड घेताच रक्तवाढीची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे वयवर्षे १८ ते ६५ यातील कोणताही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो. १८ ते २५ वयोगटातील जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान केले पाहिजे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन ते चार व्यक्तींना जीवनदान मिळते. परंतु, रक्तदान करणाऱ्यांची संख्या सध्या कमी आहे. मोठ्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रियांमध्ये रक्ताची अत्यंतिक गरज असते, अशावेळी रक्त हे संजीवनीच ठरते. परंतु, अनेक गैरसमजुतीमुळे तरुण रक्तदानासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते. प्रत्येकी तीन महिन्यांनी पुरुष आणि चार महिन्यांनी स्त्रिया रक्तदान करू शकतात. रक्तदान केल्यानंतर पुढील तपासणी प्रक्रिया करूनच ते रक्त अन्य रुग्णांना दिले जाते. यामध्ये एड्स, कावीळ बी आणि सी, मलेरिया, गुप्तरोग अशा चाचण्या करून या रक्तातून वेगवेगळे घटक बाजूला केले जातात.
ज्या रक्तामध्ये आजाराचे विषाणू सापडतात ते रक्त वापरले जात नाही. रक्तामधून काढलेल्या लाल पेशी ४२ दिवस राहतात. प्लाझ्मा एक वर्षे तर प्लेटलेट पाच दिवस जिवंत राहतात. राज्यात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा भासतो. तो भरून काढणे अत्यंतिक आवश्यक असते, अन्यथा शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागतात. एखादी तातडीची शस्रक्रिया असेल तर त्यात रक्ताच्या तुटवड्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळेच रक्ताची गरज लक्षात घेऊन श्री बल्लाळेश्वर देवस्थान पालीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी भाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली यांच्यातर्फे करण्यात आले आहे.