जिल्हा बांधकाम खात्याला डांबरीकरण मुहुर्ताची प्रतीक्षा
रस्त्यावरील खडीचे संकट लवकरच दूर करावे, आदिवासींची मागणी
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदिवासी वाडीवरील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी खडी टाकण्यात आली आहे. मात्र, कामाच्या दिरंगाईमुळे चार महिने उलटूनही रस्ता बनला नसल्याने, आता पादचाऱ्यांना व वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.
बोर्लीपंचतन-श्रीवर्धन या सरळ मार्गावर कार्ले आदिवासीवाडी हे गाव अंदाजे दोनशे घरांच्या वस्तीत वसलेले आहे. तालुक्यातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मार्गावर हे गाव असून अनेक सुविधांपासून दुर्लक्षित आहे. येथील अंतर्गत रस्त्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग अखत्यारीत मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यासाठी दहा लक्ष निधी मिळाला असताना, शासनातर्फे घालुन दिलेल्या अटी व शर्तीना बगल देत रस्त्याच्या नूतनीकरणकडे दुर्लक्ष होत आहे. कंत्राटदार व अधिकाऱ्याच्या अशा दिरंगाई कामा विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
कार्ले आदिवासी वाडीवरील रस्ता बनवण्यासाठी रस्त्यात खडी टाकली आहे. मात्र, ही खडी तीव्र उतारात अस्ताव्यस्त पसरली असून येथील पादचाऱ्यांना व वाहनधारकांना प्रवास करणं मोठ्या जिकरीच ठरत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला खडी पडून कामाला सुरुवात होणार होती. मात्र रस्त्यावर टाकलेल्या या खडीला तीन महिन्याहून अधिल कालावधी उलटला आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने टाकलेल्या खड़ी चा त्रास हां सर्वानाच होत आहे. तरीही सुस्तावलेले जिल्हा बांधकाम खाते मात्र, तत्काळ डांबरीकरण करण्याऐवजी कोणत्या मुहुर्ताची वाट पाहते ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
अनेक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव कार्यरत असणार असा बोलबाला नेहमीच ऐकायला मिळतो. मात्र, प्रत्यक्षात त्याच पायाभूत सुविधा सर्वसामान्यपर्यंत पोहचत नसल्याचा अनुभव येथील आदिवासी बांधवांना मिळत आहे.
साहेब नेहमी सांगतात –
या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. कंत्राटदारांना कळवले असून पाठपुरावा सुरू आहे.
-प्रवीण मोरे,
उपअभियंता. जिल्हा परिषद श्रीवर्धन.
प्रशासनाकडून प्रत्येक योजनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे मुलभूत सुविधापासून आजही आम्ही वंचित आहोत. आमच्या गावाचा विकास होण्यासाठी वरिष्ठांनी तरी लक्ष घालावे जेणेकरून या रस्त्याचे काम पूर्ण होईल.
-शशी पवार,
रहिवासी आदिवासीवाडी कार्ले.