• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पावसाळ्याच्या तोंडावरच महावितरणचा कारभार विस्कळीत!

ByEditor

Jun 14, 2024

सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक संतप्त

मिलिंद माने
महाड :
तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागात पावसाने वेळेवर सुरुवात केली मात्र, या पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार विस्कळीत झाला असून सततच्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिक हैराण झाले आहेत. धो-धो पाऊस सुरू झाल्यास काय स्थिती निर्माण होईल असा प्रश्न नागरिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारत आहेत.

राज्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असली तरी महाड आणि परिसरामध्ये गेली दोन चार दिवसापासून पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. काही ठिकाणी जोराचा वारा देखील सुटत आहे. या पहिल्याच पावसात महावितरण विभागाचा कारभार विस्कळीत झाला आहे. मागील काही दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील नागरिक हैराण झाले आहेत. मान्सूनपूर्व कामांसाठी महावितरण विभागाने गेली काही दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडित ठेवला होता. मात्र, तरी देखील पावसाळा सुरू झाल्यानंतर या ना त्या कारणाने वीज पुरवठा खंडित होत आहे.

महाड परिसरामध्ये अनेक गावातून आजही सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे लघु व्यावसायिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने दुग्धजन्य पदार्थ आईस्क्रीम आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे इतर व्यवसायिक देखील हवालदिल झाले आहेत.

महावितरणच्या कार्यालयात जर ग्राहकाने वीजबिल वेळेवर भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या कामांची दखल मात्र वेळेत घेतली जात नाही. जागोजागी वृक्षांच्या फांद्या वीजतारांवरून आजही लटकत आहेत. शिवाय जागोजागी ट्रान्सफॉर्मर सताड उघडे पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या जीवितास धोका देखील निर्माण झालेला आहे.

पावसाळ्यापूर्वी केली जाणारी कामे पावसाच्या तोंडावर केली जात असल्याने ऐन पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे नागरिक देखील प्रचंड संतप्त झाले आहेत. अशी कामे एक महिना आधीच करणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी केली जाणारी कामे ही सकाळीच करणे आवश्यक होते. मात्र, भर दुपारी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने उष्णतेच्या काळात नागरिक हैराण झाले होते. या परिस्थितीत आजही बदल झालेला नसून कमी पावसामुळे उष्ण वातावरण कायम आहे. त्यातच सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने केल्या जाणाऱ्या कामांवर आणि त्यांच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जात आहे.

महावितरणकडून सद्यस्थितीत अनेक कामांचे ठेके दिले जात आहेत. या ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची साधने वापरली जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. याबाबतीत अधिकारी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत. मात्र, मतांच्या जोगव्यासाठी दारोदार पंधरा दिवसांपूर्वी फिरणारे सर्वच पक्षाचे पुढारी आता वीज वितरणच्या कारभाराबाबत का गप्प आहेत? असा सवाल तालुक्यातील व शहरी भागातील नागरिक या पुढाऱ्यांना विचारत आहेत.

महाडसह ग्रामीण भागात सातत्याने होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक संतप्त झाले आहेत. रात्री खंडित झालेला वीजप्रवाह दुसऱ्या दिवशी दुपारी चालू होतो. याबाबत वीज वितरण कंपनीचे अधिकारी कोणतेच उत्तर ग्राहकांना देत नाहीत. परिणामी ग्रामीण शहरी भागातील पाणीपुरवठ्यावर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रार करून देखील त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. पुढार्‍यांच्या घरी इन्व्हर्टर मशीन आहे त्यांना वीजप्रवाह खंडित झाला तरी काही फरक पडत नसल्याने त्या तोऱ्यामध्ये पुढारी वागत असल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले असल्याचे चित्र महाडसह ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे मस्तवाल झालेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोण धडा शिकविणार असा प्रश्न तालुक्यातील आम जनतेकडून विचारला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!