प्रतिनिधी
अलिबाग : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला महाराष्ट्रात 4 पैकी फक्त एकच जागा जिंकता आली. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निमित्ताने रायगडमधील एकमेव जागा त्यांना जिंकता आली. दरम्यान, सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील आपल्या विजयात काँग्रेसचाही मोठा वाटा होता असं विधान केलं आहे. सुनील तटकरे यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी अलिबागमध्ये आले असता ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीतील विजयात महायुतीमधील घटक पक्षांबरोबरच काँग्रेसनेही आपल्याला मदत केल्याचा दावा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. शिवसेना भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी केलेली मदत या सर्वांच्या बळावर मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मला यावेळी अलिबाग विधानसभा मतदार संघातून मिळाल्याचं तटकरे म्हणाले आहेत. सुनील तटकरे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबरच काँग्रेस कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान, सुनील तटकरे यांच्या या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.