मुंबई-गोवा महामार्गावरील समस्यांची केली पाहणी
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६वरील कामातील अनेक त्रुटींमुळे या रस्त्यावर लहान मोठे अपघात होऊन असंख्य माणसे मृत्यूमुखी पडली. असंख्य माणसे जायबंदी झाली तर असंख्य माणसांना अपंगत्व आले. याविषयी आंबेवाडी ग्रामपंचायतीतर्फे ठेकेदारासहित प्रशासनाला विनंती करण्यात आली होती तरीही अजून ठेकेदाराच्या मनमानीनुसार काम सुरु आहे. यामुळे संबंधित ठेकेदार याच्या विषयी नागरिकांनी कोलाड पोलिस ठाण्यात लेखी निवेदन दिले.
कोलाड पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, आंबेवाडी नाक्यावरील रस्त्याचे कामात ठेकेराकडून मनमानी सुरु असुन या कामात हा ठेकेदार कामचुकारपणा करीत असुन तो नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे. तसेच रस्त्याच्या साईडच्या गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे केले असुन त्या गटारावर झाकण नसल्यामुळे त्या गटारात नागरिक व मुकी जनावरे पडून जखमी होत आहेत. तसेच उड्डाण पुलाचे कामही धिम्या गतीने सुरु आहे. सदर उड्डाण पुलाचे काम करताना बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम केले नाही, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर पाणी साचून राहत आहे. तसेच प्रवाशी शेडही तोडली आहे. ती बांधण्यात यावी तसेच ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदन दिल्यानंतर कोलाड पोलीस नरेश पाटील यांनी संबंधित ठेकेदाराचे इंजिनियर कांबळे याला घेऊन आंबेवाडी बाजारपेठेतील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बाजारातील रस्ते, गटारे, निवारा शेड याची पाहणी करून या नागरिकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे सांगण्यात आले. यावेळी चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, संजय कुर्ले, राकेश लोखंडे, महेंद्र वाचकवडे, बाळा शिंदे, बस स्थानकाचे व्यवस्थापक विलास धोत्रे, व्यापारी वर्ग, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.