१४ वर्षानंतरही महामार्गाच्या कामाची गती मंदावलेलीच, पर्यटकांची कोकणाकडे पाठ
सलीम शेख
माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १४ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाच्या कामाची रखडपट्टी अद्यापही सुरूच असुन हे काम कधी पूर्ण होणार? हा प्रश्नच आहे. रखडलेल्या महामार्गाच्या कामाची अत्यंत गंभीर अवस्था झाली असून या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आजही अपूर्णच राहिले आहे. राज्यातील महत्वाचा विदर्भातील समृद्धी महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण झाले. मात्र, कोकणच्या विकासाचा मार्ग असलेला मुंबई-गोवा महामार्ग वर्षानुवर्षे रखडला असल्याने कोकणवासीयांचे दुखणे कायम राहिले आहे. सरकारने अनेक वेळा महामार्गाचे काम पूर्ण करण्याची केवळ आश्वासने दिली होती. त्यामुळे आजही कोकणच्या समृद्धीचा मार्ग खडतरच राहिला. या मार्गावरील इंदापूर व माणगाव बायपास कामाचा ठेकेदार बदलला तरी कामाला गती नाही. तसेच लोणेरे, टेमपाले, लाखपाले दरम्यान रस्त्याचे काम ठीकठिकाणी अपूर्ण असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे लहान-मोठे अपघात तसेच या अपघातांतून अनेकांचे जाणारे जीव व अनेकांना आलेले कायमचे अपंगत्व पाहता हा महामार्ग जणू काही मृत्यूचा सापळाच बनला होता. गेल्या १४ वर्षांपूर्वी पळस्पे ते इंदापूर या जवळपास ९० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यानंतर इंदापूरपासून पुढे दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या महामार्गाचे काम गेली १४ वर्ष रखडले असुन पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे कामही अजून व्यवस्थित पूर्ण झालेले नाही. इंदापूरपासून पुढे असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील माणगावचा बायपासचा प्रश्नही खितपत पडला आहे. बायपासच्या कामाची रखडपट्टी यामुळे माणगाव शहरात सातत्याने वाहनांच्या १० किमी पर्यंत रांगा लागून वाहतूक कोंडी होत असते. माणगाव शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बाजारपेठेतून बाहेर पडताना वाहनचालकांच्या नाकी दम येतो.
मुंबई–गोवा महामार्गानंतर समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन तो महामार्ग पूर्ण होवून सुरु झाला आहे. मग १४ वर्ष उलटूनही मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजून पूर्ण का होत नाही? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. निसर्ग वरदान लाभलेल्या या कोकणातील गंभीर अवस्था बनलेल्या या महामार्गामुळे कोकणवासियांना कमीपणा वाटत आहे. आता राज्यात त्रिशंकू सरकार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट व नुकताच या सरकारमध्ये सामील झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) या तीन पक्षांचे सरकार सत्तेत आहे. त्यात रायगडचे खासदार सुनील तटकरे हे देखील अजित पवार यांच्या समवेत आहेत. त्यामुळे आता तरी सर्व लोकप्रतिनिधींनी सत्तेत असल्याचा फायदा घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कसे जलदगतीने पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
माणगाव व इंदापूर येथील बायपास कामातील वन व रेल्वे विभागाकडील मंजुरीच्या अडचणी दूर झाल्या असून या कामाचा पहिला ठेकेदार बदलला असून दुसऱ्या ठेकेदारांकडून हे काम करून घेतले जात आहे. लोणेरे ते टेमपाले, लाखपाले दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर इतर कामेही लवकर पूर्ण केली जाणार आहेत.
-आकांक्षा मेश्राम,
सहाय्यक अभियंता, मुंबई-गोवा महामार्ग.