विश्वास निकम
कोलाड : रायगड पोलिस दलातील ४२२ रिक्त पदासाठी ऐन पावसाळ्यात पोलिस भरती होणार असुन पावसाळ्याच्या कालावधीत ३१ हजार ६३ जणांची शारीरिक चाचणी घेण्यासाठी यंत्रणेसमोर मोठे आव्हान असेल. याच वर्षी जानेवारी महिन्यात रायगड पोलिस दलासाठी २१८ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती. आता ४२२ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यात ३९१ पोलीस शिपाई, ९ बँड्समन पोलिस शिपाई, ३१ चालक पोलिस शिपाई यांचा समावेश आहे.
सद्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शारीरिक चाचणीला अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी उमेदवारांना चाचणीसाठी पुढील तारीख देण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेने कोकणात कितीतरी जास्त पाऊस पडतो. अशा वेळी शारीरिक चाचणी घेणे यंत्रणेसाठी चांगलेच आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने ही भरती प्रक्रिया अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात घेतली जाणार नाही. त्या ऐवजी नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात कागदपत्र पडताळणी व शारीरिक मोजमाप, १०० मीटर धावणे व गोळा फेक चाचणी होणार आहे. तर ८०० व १६०० मीटर धावणे चाचणी आरसीएफ कॉलनी कुरुळ येथे पार पडणार आहे. ८०० ते १००० मुलांना चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
बँड्समन पोलिसांच्या ९ जागांसाठी १३८३ पुरुष, ३९० महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ३९१ पोलीस शिपाई पदासाठी २३ हजार ९७३ पुरुष तर ४ हजार ८६० महिला उमेदवारांचा समावेश आहे. ३१ चालक पोलिस शिपाई पदासाठी २०९६ पुरुष तर १३४ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. २१ जूनपासून ३१ हजार ०६३ उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे.
राज्यात एकाच वेळी सगळीकडे पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातही पोलीस प्रशासनाने भरती प्रक्रिया निःपक्षपातीपणे पार पडावी यासाठी नियोजन केले आहे. कोणत्याही गैरप्रकाराला या प्रक्रियेत थारा दिला जाणार नाही. पावसामुळे एखाद्या दिवशी शारीरिक चाचणी झाली नाही तर त्या दिवसाच्या उमेदवारांना सोयीस्कर दिवशी बोलावले जाणार आहे.
-सोमनाथ घार्गे,
पोलिस अधीक्षक, रायगड.