अचानक आलेल्या नदीच्या पुरातून बकऱ्यांना वाचवण्यात आले यश, सर्वत्र कौतुक
विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बाहे गावातील तरुण शेतकरी राजेश थिटे हे नेहमीप्रमाणे आपल्या बकऱ्या घेऊन कुंडलिका नदिपात्राच्या पलीकडील भागात बकऱ्या चरण्यासाठी गेले होते. अचानक नदीला पाणी वाढल्यामुळे अक्षरशः बकऱ्यांसह मालक यांचे जीव धोक्यात आला होता. परंतु, दैव बलवत्तर म्हणून रायगड कोलाड येथील SVRSS ची रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नामुळे तब्बल ४३ बकऱ्या आणि मालक राजेश थिटे याला सुखरूप बाहेर काढण्यात या टीमला यश आल्याने त्या टीमचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

तालुक्यातील बाहे गावातील तरुण महिसदरा आणि कुंडलिका नदीपात्र पलीकडील बेटावर तसेच शेतजमीन खलाटीत बकऱ्या चारण्यास गेला असता अचानक दोन्ही नदीला वाढलेल्या पाण्यामुळे तो आणि बकऱ्या अडकल्या होत्या. परंतु, रेस्क्यू टिमच्या अथक प्रयत्नाने शेतकरी राजेश थिटे आणि त्याच्या बकऱ्या सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. यामुळे सर्व रेस्क्यू टिमचे रोहा तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार शनिवार, १५ जून २०२४ रोजी दुपारचा सुमारास बाहे गावातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणुन शेळीपालन करत असलेले राजेश पांडुरंग थिटे गावाच्या बाजूला असणाऱ्या महिसदरा आणि कुंडलिका नदीपात्रात बकऱ्या चारण्यासाठी गेला असता अचानक नदीपात्रातील पाणी वाढत गेल्याने त्याच्या ४३ बकऱ्या नदीपलीकडे अडकल्या असता त्यांनी काही क्षणाचाही विलंब न लावता बाहे गावचे पोलिस पाटील मनोज थिटे यांना मोबाइलद्वारे संपर्क साधात याबाबतची माहिती दिली. ही माहिती प्राप्त होताच पोलिस पाटील यांनी रोहा पोलिस ठाणे आणि SVRSS टीमलां कॉल करून या घटनेची माहिती दिली. याबाबतची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीनार्थ सामाजिक संस्था (SVRSS) टीम घटनास्थळी दाखल झाली. रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिस मोरे यांना तैनात केले. पोलिस पाटील मनोज थिटे, राजेश थिटे यांची पत्नी, मुलगी, वडील, गावकरी यांनी देखील धाव घेत शेतकरी राजेश थिटे याला धीर देत रेस्क्यू टीमच्या मदतीने त्यांच्या सर्व बकऱ्या वाचवण्यात यश मिळवले.
कुंडलिका नदीला नेहमीपेक्षा पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात अचानक वाढली होती. पाण्याचा प्रवाह जास्त होता. तरीही रेस्क्यू टीमने दुपारी १२. ३० ते ४.३० या दरम्यान तसेच अधिक नदीला असलेली भरती अशा परिस्थितीत आपली सुरक्षा घेऊन सेफ्टी जॅकेट व रोपचा वापर करून सुरक्षितरित्या एक एक करून बकऱ्यांना नदीच्या बाहेर सुखरूप काढण्यात आल्या. गावातील दोन तरुण बचाव कार्यासाठी सोबत होते. यावेळी सागर दहिंबेकर यांची रेस्क्यू टीम सूरज दहिंबेकर, प्रवीण भगत, आदेश पाटेकर, शुभम सणस, भूषण महाडिक, ओमकार महाडिक, रोहा पोलीस मोरे, पोलीस पाटील मनोज थिटे उपस्थित होते. शेतकरी राजेश थिटे आणि ४३ बकऱ्यांची सुखरूप सुटका केल्यानंतर रेस्क्यू टीम आणि उपस्थित नागरिक यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
१५ जून २०२४ रोजी डोलवहाळ धरणाला तडा गेलाय या अफवेमुळे धरणाचे ८ दरवाजे एकदम उघडल्यामुळे कुंडलिका नदीचे पात्र अचानक वाढले. बाहे गावातील शेतकरी तसेच शेळी पालक राजेश थिटे हे आपल्या बकऱ्या चारण्यासाठी धाटाव, उडदवणे, बाहे या तीन गावच्या सिमेवर असलेल्या मोरजई नावाच्या बेटावर तसेच खलाटीत गेले होते. मात्र, परतीच्या वेळी अचानक नदीचे पाणी वाढल्याने ते व त्यांच्या बकऱ्या अडकून पडल्या होत्या.. SVRSS कोलाड या टीमचे प्रमुख सागर दहींबेकर यांना रेस्क्यूसाठी कॉल केला. रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे साहेबांपर्यंत बातमी समजल्याने त्यांनी त्या ठिकाणी पोलीस तैनात केले होते. काही क्षणात आपत्ती व्यवस्थापन टीम हजर झाली आणि त्यांनी या शेतकऱ्याच्या ४३ बकऱ्यांना जीवदान देत या महाप्रलयातून त्यांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. सुरज दाहींबेकर ह्या कार्यात लीड करत होते. त्यांना योग्य स्थळी घेऊन गेलो. सर्व सेफ्टी साहित्याचा वापर करून टीमने जीवाची बाजी लावत एक एक बकरी सुरक्षित जागेवर आणून ४३ बकऱ्यांना जीवदान दिले.
-मनोज थिटे,
पोलिस पाटील