विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या काही एसटी बसेस पेण शहर व वडखळ नाका येथून न जाता त्या ओव्हर ब्रिजवरून जात असल्यामुळे त्याचा परिणाम वडखळ बाजारपेठेवर होत आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशी वर्गाला रामवाडी येथे उतरून दुसऱ्या गाडीने प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशी वर्गाला आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एसटी बसेस या ओव्हर ब्रिजच्या खालून नेण्यात याव्यात अशी मागणी वरसगांव (कोलाड) येथील शिवसेना शाखाप्रमुख विश्वास बागुल यांनी विभागीय नियंत्रक, पेण यांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.
पेण, वडखळ, नागोठणे, पाली तसेच असंख्य एसटी स्टॅण्डमध्ये पावसाळ्यात अतिशय बिकट अवस्था असते. येथे विद्यार्थी, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, या प्रवाशी वर्गाला चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे, तरी शासनाने याकडे लक्ष देऊन बस स्टँडची डागडुजी करावी अशी मागणी विभागीय नियंत्रण अधिकारी पेण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.