वाघजाईजवळ दरड आणि भूस्खलन; शासनाचे करोडो रुपये गेले पाण्यात!
मिलिंद माने
महाड : महाड-भोर पुणे मार्गावरील वरंध घाटात जागोजागी दरडीचा धोका कायम असल्याने या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांच्या जीवावर बेतू शकते. हा घाट अत्यंत धोकादायक झाला असून या मार्गावर वाघजाईजवळ दरी असलेल्या ठिकाणी रस्त्याचा दरीकडील एक भाग कोसळला आहे. वरंध घाटात जागोजागी दरडी आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी छोटे छोटे दगड रस्त्यावर आले आहेत. बुधवारी सकाळी श्री वाघजाई मंदिराजवळ रस्त्याचा एक भाग खचला गेला आहे. हा भाग भोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत आहे.

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडला जाणारा महाड-भोर पुणे हा मार्ग गेली काही वर्ष भूस्खलन आणि दरडींमुळे सातत्याने बंद पडत आहे. बुधवारी सकाळी श्री वाघजाई मंदिराजवळ दरीच्या दिशेने असलेल्या संरक्षक भिंतीचा काही भाग खचला गेला आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी मुसळधार पाऊस नसल्याने या घाटात पर्यटक तुरळक प्रमाणात आहेत. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत आहे. मात्र, तरी देखील हा घाट मार्ग वाहतुकीस धोकादायकच ठरत आहे.
या घाटात सरंक्षक कठडे, पाण्याचा निचरा होण्यासाठी केली जाणारी गटारे आणि इतर आवश्यक बाबी दरवर्षी करणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नित्याचे काम आहे. याकरिता केलेल्या तरतुदीनुसार खर्च केला जातो. हा मार्ग सद्या महामार्ग बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. अद्याप हे काम अत्यंत संथगतीने सुरु असले तरी घाटातील बहुतांश भागात खोदकाम केले जात आहे. गेली दोन वर्षापासून वरंध घाटात ज्या ठिकाणी दरडी आणि भूस्खलन झाले होते त्याठिकाणी सिमेंट कॉंक्रीटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. आतापर्यंत जवळपास ६ कोटी रुपये खर्च करून भिंती उभ्या केल्या. ज्या ठिकाणी भिंती उभ्या केल्या आहेत त्या शेजारील भाग देखील मातीचा असल्याने या पावसात अनेक ठिकाणी माती खाली येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दरडीचा धोका हा कायम असल्याने करोडोच्या भिंती किती ठिकाणी उभ्या करणार असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
पावसाळी पर्यटनासाठी वरंधा घाट धोकादायक
पावसाळ्यापूर्वी नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे वरंधा घाटात प्रवास करणे धोकादायक बनले आहे. वरंधा घाटात पावसाळी पर्यटन वाढले आहे. येथील धबधबे आणि निसर्ग सौंदर्य सर्वानाच आकर्षित करते. यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात या घाटातून दुचाकीवरून प्रवास करते. यामुळे घाटात काम करणाऱ्या कंपनीकडून सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे.