रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंगमुळे स्थानिक नागरिकांचे हाल!
मिलिंद माने
महाड : पावसाळा सुरु झाल्यानंतर संपूर्ण रायगडावर पसरलेली धुक्याची झालर आणि पर्यटकांना आकर्षित करणारे पावसाळी वातावरण यामुळे किल्ले रायगडावर पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. रविवार सुट्टी असल्याने रायगड किल्ला हाऊसफुल झाला आहे. यामुळे वाहन पार्किंगचे तीन तेरा वाजले असून रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावल्यामुळे स्थानिक नागरिकांची वाहतूक व्यवस्था कोलमडली गेल्याचे चित्र आज रायगड पाहावयास मिळाले. मात्र व्हीआयपींसाठी बंदोबस्त ठेवणारे प्रशासन इतर वेळेस मात्र कुठे आहे? असा सवाल पर्यटक विचारताना दिसले.

रायगड किल्ल्यावर सप्टेंबरनंतर पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. यावर्षी ऐन जून महिन्यातच पावसाळी पर्यटनाला वेग आला आहे. पहिल्या पावसात महाड रायगड मार्ग आणि किल्ल्यावरील कोसळणारे धबधबे यामुळे पावसाळी पर्यटन वाढले आहे. रायगडावर आज रोपवे आणि पायी चालत जाण्यासाठी रांगा लागल्या आहेत. सुट्टीच्या रविवारमध्ये दोन ते तीन हजार पर्यटक आज रायगडावर दाखल झाले होते. पाचाडपासून हिरकणीवाडी आणि पायथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांनी दुतर्फा वाहने लावल्यामुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. सद्या मुख्य चित्तदरवाजा येथून पायरी मार्ग तसेच गडावर जाणारा पर्यायी मार्ग असलेल्या नाणे दरवाजाने देखील अनेक पर्यटक जात असल्याने चित्त दरवाजा ते नाणे दरवाजा इथपर्यंत असलेल्या अरुंद रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावल्यामुळे रायगड वाडी आणि त्यापुढे जाणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना वाट काढणे कठीण झाले होते.
पर्यटकांची संख्या जास्त असल्याने निवास व्यवस्थेला मागणी!
महाड, पाचाड व हिरकणीवाडी येथील निवास व्यवस्था देखील फुल्ल झाली आहे. रायगडावर रोप वेने जाण्यात वेगळेच थ्रील असल्याने हा अनुभवही पर्यटक घेत आहेत. तर गडावर रोप वे एवजी पायी गड चढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असल्याचे पाहावयास मिळाले. गडाच्या पायथ्यापासून पर्यटकांची लगबग सुरू असल्याने हिरकणीवाडी, रायगड पायथा या ठिकाणी न्याहरी, भोजन तसेच घरगुती जेवणाचा व्यवसाय तेजीत आहे.
पाचाड ते किल्ले रायगड यादरम्यान पर्यटक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावतात. रोप वेकडे जाणाऱ्या मार्गापासून चित्त दरवाजापर्यंत अरुंद रस्ता आहे. एकीकडे रायगड किल्ला असल्याने साईडपट्टी देखील नाही. यामुळे वाहनचालक अर्ध्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने पार्क करतात. यामुळे अन्य वाहनांना पुढे जाता येत नाही. किल्ले रायगडच्या पलीकडे रायगडवाडी, निजामपूर, वाघेरी, बावळे, कोळीआवाड हि गावे येतात. या गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी खाजगी आणि एसटी सेवा उपलब्ध आहे. मात्र, पर्यटकांच्या वाहनांमुळे हि एसटी पुढे नेता येत नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. चित्त दरवाजा येथून निजामपूर रायगड वाडी या ठिकाणी चालत जाण्याची वेळ वयोवृद्ध ग्रामस्थांवर येत आहे. महाड तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत याठिकाणी एक पोलीस चौकी आहे, मात्र याठिकाणी वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावून गेल्यानंतर या मार्गातून वाट काढणे वाहन चालकांना कठीण होते.
पार्किंग व्यवस्था मजबूत करणे गरजेचे!
किल्ले रायगडावर यापूर्वी पावसाळ्यामध्ये अत्यल्प प्रमाणात पर्यटक व शिवभक्त फिरत होते. जून महिन्यापासून ते अगदी ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी फारच तुरळक पर्यटक दाखल होत होते. मात्र आता पर्यटकांची गर्दी खूपच वाढली आहे. नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापेक्षाही अधिक पर्यटक रविवारच्या सुट्टीमध्ये किल्ले रायगडावर दिसून आले. यामुळे रस्ता रुंद करण्याबरोबरच पाचाड, रायगड वाडी या ठिकाणी उत्तम पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे. रायगड किल्ल्यावर येणाऱ्या व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी जेवढे पोलीस कार्यरत असतात वास्तविक पाहता एवढ्या पोलिसांची गरज नसते मात्र यातून पोलीस पर्यटकांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे चित्र शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान पाहावयास मिळाले. पोलीस बंदोबस्तामुळे अनेक शिवभक्तांना विशेषत: महिला वर्गांला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, पर्यटकांना व शिवभक्तांना इतर वेळेस मार्गदर्शन करण्यासाठी अथवा एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी या ठिकाणी शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रिया अनेक पर्यटकांमधून ऐकावयास मिळाल्या.