• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड-रायगड रोडवरील रखडलेल्या पुलामुळे अतिवृष्टीच्या काळात चार गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता!

ByEditor

Jun 23, 2024

राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी सुस्त, ठेकेदार मस्त! जनता हतबल…राजकीय नेते सुस्तावले?

मिलिंद माने
महाड :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 प्रमाणे मागील तीन वर्षापासून महाड-रायगड रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम चालू आहे. याच कामात लाडवली जवळील मांडले नदीवरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास या भागातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी सुस्तावले असून ठेकेदार मस्तावल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

महाड-रायगड रस्त्यावरील लाडवली गावाजवळ मांडले नदीवर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम मागील दोन वर्षापासून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत चालू आहे. मात्र, चालू वर्षी पावसाळा तोंडावर आला असताना या पुलाच्या कामाच्या पूर्णत्वाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. लाडवली गावाजवळील पुलाच्या कामाचे बांधकाम अत्यंत धीम्यागतीने चालू होते, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम महाडच्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले. याच मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. मात्र, याचे गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकारी आकांक्षा मेश्राम यांना नसल्याने सद्यस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या रायगड परिसरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लाडवली गावाजवळील अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलाचे काम तातडीने करावे यासाठी स्थानिक नागरिकांनी 10 जून रोजी रास्ता रोको करून आंदोलन केले होते. त्यावेळेस या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात पर्यायी मार्ग म्हणून पाईप टाकून रस्ता केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, कालच्या पावसात या ठिकाणचे पाईपच वाहून गेल्यामुळे या गावातील नागरिकांना नदीच्या पाण्यातून धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे.

महाड-रायगड रस्त्याच्या 24 किलोमीटर अंतराचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत चालू आहे. मात्र, अर्धवट अवस्थेत असणाऱ्या कामामुळे वारंवार या मार्गावर अपघात घडत आहेत. वाडा, लाडवली, वरंडोली, चापगाव, तळोशी, नांदगाव खुर्द, कोकरे या ठिकाणी पुलांची कामे अद्याप सुरू झाली नाहीत, झाली ती अर्धवट अवस्थेत आहेत परिणामी या परिसरातील नागरिकांना व वाहनधारकांना चिखलातून प्रवास करावा लागत आहे.

महाड रायगड रस्त्यावरील लाडवली पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत 10 जून रोजी स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको केल्यानंतर देखील या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यास अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला अपयश आले आहेच मात्र, अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला पाठीशी घालण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड येथील अधिकारी करीत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. एकंदरीत ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था महाडच्या राष्ट्रीय महामार्ग खात्याची झाली आहे.

महाड तालुक्यात पावसाळ्यात 3000 मिलिमीटरपर्यंत पर्जन्यवृष्टी होते. तसेच महाड व आजूबाजूचा परिसर पूर प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर झालेला असताना त्यातच या महाड-रायगड रस्त्यावरील लाडवली, नाते या भागापर्यंत पुराचे पाणी जाते याची कल्पना राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड येथील अधिकारी आकांक्षा मेश्राम यांना नाही का? उद्या या अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलाच्या रस्त्यावरून प्रवास करताना पुराचे पाणी येऊन एखाद्याचा जीव गमावला तर राज्य शासनाने राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!