• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऐन पावसाळ्यात कर्जतमध्ये पाणी पेटलं; नगरपरिषदेला नागरिकांचा घेराव

ByEditor

Jun 26, 2024

पाणी का येत नाही? म्हणत विचारला जाब

गणेश पवार
कर्जत :
पावसाळा सुरु झाला असल्याने आता सर्वत्र पाणी टंचाई निकाली निघाली आहे. मात्र, तरीही कर्जत शहरात पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु आहे. नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे कोतवाल नगर परिसरातील नागरिकांनी थेट नगरपरिषद कार्यालय गाठत पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. आम्ही वेळेत पाणीपट्टी भरून देखील आम्हाला पाणी का मिळत नाही? असा सवाल केला. नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देताना पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील यावेळी घाम फुटला. दरम्यान, वारंवार होणाऱ्या पाण्याच्या त्रासामुळे कर्जतचे पाणी पेटले असल्याचे चित्र आहे.

उन्हाळा आता सरला असून पावसाळा सुरु झाला आहे. कर्जतमध्ये काही दिवसांपूर्वी पाऊस मुसळधार कोसळून झाला. त्यामुळे नदी नाले पुन्हा वाहू लागले आहेत. एकीकडे ग्रामीण भागात शासनाने पाणी पुरवठा करणारे टँकर बंद केले आहेत. तर दुसरीकडे कर्जत सारख्या शहरात पाणी टंचाईचे संकट नागरिकांवर ओढावले आहे. कर्जत शहरासाठी २००७ साली १४ कोटी ३२ लाख रुपये खर्चून शासनाने पाणी योजना केली होती. तर तालुक्यातील पेज नदीवरून पाणी उचलून ते कर्जत शहरात आणले जाते. मात्र हि योजना आता जुनी होऊन या योजनेतील पाण्याची लाईन देखील जीर्ण झाली आहे. त्यामुळे अनेकदा पाईपलाईन फुटून पाणी वाया जाण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तर आजच्या घडीला शहरात ६ हजार ८०० नाळ जोडणी देण्यात आली आहे. घराला १५०० रुपये सोसायटीला ६००० तर व्यावसायिक ८००० रुपये पाणीपट्टी कर्जत नगरपरिषद आकारते. वर्षाला पाणीपट्टी पोटी २ कोटीच्या घरात वसुली केली जाते. तर वर्षाला त्यावर अधिकचा खर्च आहे. मात्र, पावसाळा सुरु झाला असताना देखील कर्जत शहरातील नागरिकांवर पाणीबाणी उद्भवली आहे. शहरातील अनेक प्रभागात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा सुरु आहे. त्यामुळे पहिल्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना पाणीच मिळत नाही. परिणामी गृहिणी देखील कंटाळत असून घरातील काम शिल्लक राहत आहेत.

पाण्यासाठी नागरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करून देखील पाणी मिळत नसल्याने सोमवार, दि. २४ जून रोजी कोतवालनगर परिसरातील नागरिकांनी थेट कर्जत नगरपरिषदेवर धडक दिली. यावेळी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांसह अभियंते यांना नागरिकांनी घेराव घालत पाण्यासाठी जाब विचारला. नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देताना अधिकाऱ्यांची देखील भंबेरी उडाली होती. याबाबत नागरिकांनी नगरपरिषदेला निवेदन देखील सादर केलं आहे. मात्र तरीही उद्या प्रत्यक्ष जागेवर येऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढतो असे सांगत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वेळ मारून नेली. याबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व संबंधित अभियंता यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, या अगोदर देखील कर्जत शहरातील इतर भागात पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याने अनेकांनी नगरपरिषदेच्या खेटा घातल्या आहेत. असे असताना देखील पाण्याचा प्रश्न निकाली निघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा प्रश्न नगरपरिषद सोडवणार कि नागरिकांना खेटा घालाव्या लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!