रस्त्यावरील चिखल खड्ड्यामुळे अपघात होण्याची भीती
अनंत नारंगीकर
उरण : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या जासई-गव्हाण रस्त्यावर सततच्या डेब्रिज व अवजड वाहनांच्या रहदारीमुळे पहिल्या पावसात रस्त्यावर चिखलाचा खच साचून खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या चिखलामुळे व खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे.

जासई-न्हावा हा मार्ग या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी बनविण्यात आला होता, मात्र या रस्त्यालगत ज्वलनशील कंटेनर धुण्याचे यार्ड, रिकामे कंटेनर यार्ड वसविण्यात आले आहेत. तसेच सतत मुंबई परिसरातील डेब्रिज भरलेल्या वाहनांची रेलचेल सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी बनविण्यात आलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडू लागले आहेत. तसेच पावसाळ्यात रस्त्यावर चिखल मातीचा खच पडला आहे. त्यामुळे या मार्गांवरून मार्गक्रमाण करणाऱ्या वाहनांना, मोटारसायकलस्वार, रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रात्री अपरात्री अपघात होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
