विश्वास निकम
कोलाड : गेली दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असुन या पावसामुळे रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात शेतकरी वर्गानी खरीपातील भात लावणीला सुरुवात केली आहे.
यावर्षी पाऊस सरासरी पेक्षा उत्तम पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. याप्रमाणे पावसाला वेळेवर सुरुवात झाली असुन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाताची पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर भाताची रोपे रुजण्यासाठी रिमझीम पाऊस पडत होता. हा पाऊस भात रोप तयार होण्यासाठी चांगला होता. परंतु, काही दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे थोडया प्रमाणात शेतकरी वर्ग धास्तवला होता, परंतु गेली दोन दिवसापासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखवाला असुन कोलाड परिसरात भात लावणीला सुरुवात करण्यात आली आहे.
रोहा तालुक्यात साधारणपणे ९८०० हेक्टर शेत जमिनीत भाताचे पीक घेतले जाते. बुधवार, दि. २६ जुनपासुन पावसाने जोर धरला असल्यामुळे भातशेतीत मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध झाला असुन भात लावणीसाठी पुरेसे पाणी असल्यामुळे कोलाड परिसरात भात लावणीला सुरुवात करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस मजुरीचे दर, खतांचे दर, नांगरणीचे दर वाढत चालेल असुन शेती करणे अधिक खर्चाचे झाले आहे, परंतु असे असले तरी खेडेगावात काही ठिकाणी अजूनही हांदे पद्धतीने शेती केली जात असल्यामुळे मजुरीची काही प्रमाणात बचत होत आहे. यामुळे भातशेती करणे सोयीस्कर होते.
लिलाधर दहिंबेकर
शेतकरी गोवे, रोहा.