रेल्वे प्रशासनाची उडाली तारांबळ, प्रवाशी हैराण
अनंत नारंगीकर
उरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या उरणच्या रेल्वे स्टेशनमधील अंडरग्राऊंडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची घटना गुरुवारी (दि. २७) घडली. त्यामुळे रेल्वेच्या व केंद्र सरकारच्या भ्रष्ट कामांची पोलखोल झाल्याने रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. मात्र, प्रवाशांना रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागला असून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई शहराला जोडणारी उरण लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची वाट गेली ५० वर्षे उरणची जनता पाहत असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात मार्च २०२४ मध्ये उरण लोकल रेल्वेसेवेचा शुभारंभ केला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे मागील वर्षीच्या पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या उरणच्या रेल्वे स्टेशनमधील अंडरग्राऊंडमध्ये चार ते पाच फूटापर्यंत पावसाचे पाणी शिरल्याची बाब समोर आली होती. यावेळी उरणकरांच्या स्वप्नावर रेल्वे प्रशासनाने पाणी शिंपडण्याचे चित्र समोर आले, मात्र तरुण वर्गाने रेल्वे स्टेशनमध्ये साचलेल्या पाण्यात मुक्त संचार करत पोहण्याचा आनंद लुटला होता. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शुन्य, भ्रष्ट कारभाराची पोलखोल झाल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. मात्र, रेल्वेमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत ठोस उपाययोजना न करता किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न करता उरणची रेल्वेसेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील वर्षीची पुनरावृत्ती यावर्षीच्या पावसाळ्यात होणार अशी भीती रेल्वे प्रशासनाला वाटत असल्याने खबरदारी म्हणून उरण स्टेशनमध्ये साचणारे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी चक्क पाच मोठाले पंप सज्ज करुन ठेवले होते.
मात्र, शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी बरसणाऱ्या पावसाच्या सरीत पुन्हा एकदा उरण रेल्वे स्टेशनच्या अंडरग्राऊंडमध्ये पावसाचे पाणी साठण्याचे चित्र समोर आले. पावसाचे पाणी साठून राहील्याने प्रवाशी नागरिकांना मार्गक्रमण करताना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. यावेळी रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. रेल्वे प्रशासनाने वॉटर पंपाच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी अयोध्या नगरीतील श्री राम मंदिराच्या गाभाऱ्यात लागलेली गळती किंवा उरण रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्यामुळे केंद्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल झाली हे मात्र खरे असल्याची चर्चा सध्या जनमानसात उमटत आहे.
या संदर्भात उरण रेल्वे स्टेशनचे मॅनेजर गौतम कुमार यांना विचारले असता ते रेल्वे स्थानकात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.