मनसेचे वैभव खेडेकर यांचा सरकारला इशारा
मिलिंद माने
महाड : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना गेली अठरा वर्षापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यातूनच प्रवास करावा लगत आहे. त्यातच रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू झाल्याने या बोगद्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने याप्रकरणी ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी कोकणातील मनसेचे नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केली आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या नातू नगर येथील कशेडी बोगद्याचे काम अद्याप सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी या बोगद्यातील वाहतूक सुरु केली होती. मात्र, बोगद्याला ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने पाण्याच्या धारा चालू झाल्या आहेत. याबाबत खेडचे माजी नगराध्यक्ष व मनसेचे कोकणचे नेते वैभव खेडेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कशेडी बोगद्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असे सांगून ज्या पद्धतीने या बोगदात सुरक्षेच्या उपायोजना करावयास पाहिजे होत्या त्या केल्या गेल्या नाहीत त्यामुळे आज ही परिस्थिती कशेडी बोगद्यात उद्भवल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले.
पाणी टंचाईच्या काळात बोगद्यातील शुद्ध पाणी खेडला द्या!
खेडेकर यांनी मे महिन्यामध्ये ज्या पद्धतीने कोकणात पाणीटंचाई निर्माण होते त्यावेळेला शुद्ध पाण्याची नागरिकांना गरज असते, या बोगद्यातील पाणी शुद्ध असून ते पाईपलाईनद्वारे खेडला द्यावे अशी परिस्थिती या बोगद्यात निर्माण झाल्याचे सांगितले. करोडो रुपये या बोगद्याच्या कामावर खर्च झाले मात्र, या बोगद्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व ठेकेदार जबाबदार असून या सर्वांवर खातेनिहाय चौकशी होऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगदाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत जो भ्रष्टाचार झाला आहे व शासनाचे करोडो रुपये खर्च झाले आहेत त्याबाबत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कोकणातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा अशी मागणी देखील खेडेकर यांनी केली आहे.
कोकणातील जनतेच्या नशिबी निकृष्ट दर्जाचा महामार्ग आहे, तसेच निकृष्ट दर्जाच्या कशेडी बोगद्याचे काम केले आहे. त्याऐवजी चांगल्या पद्धतीचा महामार्ग व व चांगल्या पद्धतीच्या बोगद्याचे काम शासनाने ठेकेदारामार्फत करून घेतले नाही तर कोकणवासीय रस्त्यावर उतरतील असा इशारा मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी शासनाला व राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अभियंत्यांना दिला आहे.