विनायक पाटील
पेण : छत्रपती शाहू महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचा कॉमर्स विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय दिन आणि आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप्रज्वलन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली एस. पाटील यांनी आपल्या मनोगतात सामाजिक न्याय दिनाचे महत्त्व पटवून दिले आणि तरुण मुलांमधील वाढती व्यसनाधीनता कशी चिंताजनक आहे तसेच ती कशी दूर झाली पाहिजे याबाबत आपले विचार व्यक्त केले. डॉ. शाम कदम, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनी व्यसनाधीनतेचे प्रकार आणि तरुण पिढीला त्यापासून दूर करण्याच्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला हे समजून सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली.

रायगड जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्याभिषेकापासून तर त्यांच्या निधनापर्यंत अतिशय अल्पकाळामध्ये त्यांनी केलेले सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक औद्योगिक, कृषीक्षेत्रातील विविध सुधारणा विपरीत ब्रिटिश काळामध्ये कशा राबविल्या याबाबत मार्गदर्शन केले. १९०२ मध्ये मागासवर्गीयांना कोल्हापूर संस्थानामध्ये ५० टक्के आरक्षण देऊन सामाजिक न्याय कसा प्रस्थापित केला आणि आज छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना भारतीय राज्यघटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कसे स्थान निर्माण करून दिले याबद्दल माहिती दिली. प्रा. डॉ. पी. बी. आचार्य, कॉमर्स विभाग प्रमुख यांनी देशांमध्ये वाढणारी विविध प्रकारची व्यसनाधीनता दूर करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि शेवटी व्यसनमुक्तीचा संकल्प दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती माधुरी पाटील, कार्यालयीन अधीक्षक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग रायगड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्वेता पाटील यांनी केले तर प्रा. डॉ. पी. बी. गायकवाड, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ नेहमी पाठीशी असल्याने अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची प्रेरणा मिळते. यासाठी सन्माननीय अॅड. गौतम पाटील, अध्यक्ष जनता शिक्षण मंडळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद रायगड आणि इतर सर्वांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्रा. सौ. अश्विनी आठवले, प्रा. कपिल कुलकर्णी, प्रा. सुनील ठोकळे, प्रा. विनायक साळुंके, प्रा. शंतनु वालदे तसेच इतर प्राध्यापक, विद्यार्थी याच बरोबरच अलिबागमधील विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी, दोन्ही वसतिगृहाचे गृहपाल, जिल्हा क्रीडा विभागाचे अधिकारी यांचा सहभाग लाभला.