मिलिंद माने
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हा माणगाव शहरातून जातो, मात्र दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह चाकरमानी या वाहतूक कोंडीला त्रस्त झाले असून आज सायंकाळी पाच वाजल्यापासून माणगाव शहरात वाहतुक कोंडी निर्माण झाली असून दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर माणगाव शहरात मुंबई बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र माणगावात सायंकाळी पाच वाजल्यापासून पाहावयास मिळत होते. माणगाव शहरात साधारण दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. शहरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहने उभी असतात, त्यातच श्रीवर्धनकडून येणाऱ्या व श्रीवर्धनकडे जाणाऱ्या तसेच तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून मुंबई व महाड बाजूकडे जाणारी वाहने, त्यानंतर माणगाव बस आगारामध्ये जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस तसेच माणगाव आगारासमोरील ताम्हिणी घाटातून पुणे मार्गे जाणारे व येणारी वाहने यांच्यामध्ये रस्ता पार करण्यासाठी चढाओढ लागलेली असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.
माणगाव शहरात झालेल्या वाहतूक कोंडीतून वाहने काढण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेचे पोलीस व महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस करीत होते, परंतु माणगाव शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यात माणगाव नगरपंचायत, माणगाव तालुका पोलीस ठाणे, रायगड जिल्हा वाहतूक शाखा, महामार्ग वाहतूक शाखा यांना अपयश आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा आलेल्या दुकानदारांनी रस्त्यावर बस्तान मांडल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत कुठल्याही अधिकाऱ्यांची व राज्यकर्त्यांची मानसिकता नसल्यामुळे माणगावमध्ये दररोज वाहतूक कोंडी होत आहे. मात्र यात भरडला जातो तो मुंबईला वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकामधील रुग्ण तसेच अनेक खाजगी वाहनांमधील व एसटीमधील अबालवृद्ध व शाळकरी विद्यार्थी. मात्र नियोजन कोणी करायचे? हाच मोठा प्रश्न निर्माण झाल्याने माणगावातील वाहतूक कोंडी कधी सुटणार? असा प्रश्न कोकणात जाणाऱ्या व मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना पडला आहे.